Air Pollution: प्रदूषणामुळे येऊ शकतो हार्ट ॲटॅक, अशी घ्या काळजी

| Updated on: Oct 22, 2022 | 12:43 PM

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या संशोधनानुसार, वायू प्रदूषणामुळे हृदयाची गती अनियमित होऊ शकते. अशा परिस्थितीत काही वेळा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही असतो.

Air Pollution: प्रदूषणामुळे येऊ शकतो हार्ट ॲटॅक, अशी घ्या काळजी
Follow us on

नवी दिल्ली – राजधानी दिल्ली आणि एनसीआरच्या अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता परत खराब झाली आहे. दिल्लीमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स (Air Quality Index) गंभीर श्रेणीत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे (pollution)श्वसनाचे आजार होण्याचा धोका असतो, मात्र त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारही होऊ शकतात. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, अशा वातावरणात हृदय विकाराचा त्रास असलेल्या (heart patients) रुग्णांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. त्याशिवाय इतर लोकांनीही आपल्या हृदयाची काळजी घेणे गरजेचे आहे. डॉक्टर सांगतात की देशात सीओपीडीचे 65 टक्के रुग्ण हे धूम्रपान करत नाहीत. म्हणजेच, खराब हवेमुळे रुग्णांचे फुफ्फुस निकामी होत आहे.

अशा परिस्थितीत त्या लोकांना जास्त त्रास होतो, ज्यांना त्यांच्या कामामुळे धुराचा सामना करावा लागतो. यामध्ये विविध कंपन्यांमध्ये काम करणारे लोक आणि बांधकाम सुरू असलेल्या भागातील लोकांचा समावेश आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या संशोधनानुसार वायू प्रदूषणामुळे हृदयाच्या ठोक्याचा वेग हा अनियमित होतो. अशा परिस्थितीत काही वेळा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही असतो. ज्या लोकांना आधीच हृदयरोग आहे त्यांची प्रकृतीही बिघडू शकते. अशावेळी लोकांनी वाढत्या प्रदूषणापासून स्वत:चा बचाव करणे अत्यंत गरजेचं आहे.

अशी घ्या हृदयाची काळजी –
यासाठी हृदयरोग असलेल्या रुग्णांनी त्यांची औषधे नियमितपणे घेणे गरजेचे आहे. जे लोक हृदयरोगाशी झगडत नाहीत, त्यांनीही स्वत:ची काळजी घेऊन धूळ, धूर तसेच प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क लावावा. शरीर हायड्रेटेड ठेवावे, सतत पाणी पीत रहावे. बीपी, रक्तातील साखरेची पातळी तपासत रहावी तसेच हृदयविकाराचा झटका येण्याचे कोणतेही लक्षण दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

हे सुद्धा वाचा

श्वसनाचा आजार असलेल्या रुग्णांमध्ये होत आहे वाढ –
दिल्ली एनसीआरमधील प्रदूषणामुळे श्वसनाच्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. लोकांना दमा, ब्रॉंकायटिस आणि श्वास घेण्यास होणारा त्रास अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. ज्या लोकांना आधीच दम्याचा त्रास आहे त्यांनाही अशा वातावरणात खूप त्रास सहन करावा लागत आहे. या काळात रुग्णांनी आपल्या आहाराची काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. थंड पदार्थांचे सेवन करणे टाळावे. दम्याच्या रुग्णांनी इनहेलर सोबत ठेवावा. तुम्हाला श्वासोच्छवासाचा त्रास होत असेल किंवा कोणतीही ॲलर्जी असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. असे केल्याने श्वसनाच्या आजारांपासून सहज बचाव होईल.