भारतातील कोरोना हाहाकाराने वैज्ञानिकही चक्रावले, नव्या संशोधनातून ‘या’ गोष्टी उघड

| Updated on: Apr 26, 2021 | 7:49 PM

भारतात दुसऱ्या कोरोना संसर्गाच्या लाटेत वाढत असलेल्या कोरोना रुग्ण आणि मृत्यू होणाऱ्यांची आकडेवारी पाहता वैज्ञानिकही चक्रावले आहेत.

भारतातील कोरोना हाहाकाराने वैज्ञानिकही चक्रावले, नव्या संशोधनातून या गोष्टी उघड
coronavirus in india
Follow us on

नवी दिल्ली : भारतात दुसऱ्या कोरोना संसर्गाच्या लाटेत वाढत असलेल्या कोरोना रुग्ण आणि मृत्यू होणाऱ्यांची आकडेवारी पाहता वैज्ञानिकही चक्रावले आहेत. पहिल्या कोरोना लाटेत भारतातील काही भागातील शहरांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. अनेकजणांमध्ये तर कोरोनाची लक्षणं न दिसताच रोगप्रतिकारक शक्ती (अँटिबॉडीज) तयार झाल्याचं सार्स पाहणी अहवालातून समोर आलं. त्यामुळे अनेक संशोधकांना दुसऱ्या लाटेत भारतात कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल असं वाटलं. यामागे पहिल्या लाटेत तयार झालेली रोगप्रतिकार शक्ती असेल असंही वाटलं (Scientist and researcher shocked by community infection of Corona in India).

आधीच्या अनुभवावरुन आणि अभ्यासावरुन संशोधकांना भारतात कोरोना संसर्गाची मोठी लाट येणार नाही असं वाटलं असलं तरी आता समोर येत असलेली संसर्गाची आकडेवारी पाहून वैज्ञानिकही चक्रावले आहेत. देशातील कोरोना संसर्गाने सर्व वैज्ञानिकांना या आकलनावर पुन्हा विचार करण्यास भाग पाडलंय. नव्याने झालेल्या मंथनात असंही बोललं जात आहे की पहिल्या कोरोना लाटेने केवळ शहरी आणि निमशहरी भागांमध्ये शिरकाव केला होता. त्यामुळे त्यावेळच्या अभ्यास अहवालातील निष्कर्ष केवळ त्या भागापुरतेच मर्यादित होते. त्याला संपूर्ण देशातील लोकसंख्येला लागू करता येणार नाही.

मागील अँटिबॉडी अहवाल भारतातील व्यापक संसर्गावर भाष्य करण्यास पुरेसा नव्हता, असंही आता काही संशोधक म्हणत आहेत. मागील कोरोना लाटेत सुरक्षित राहिलेल्या लोकसंख्येपर्यंत या लाटेत संसर्ग पोहचत आहे. यात पहिल्या लाटेत विलगीकरणात राहणाऱ्या आणि सर्व नियमांचं पालन करुन वाचलेल्या नागरिकांचाही समावेश आहे. कारण हेच नागरिक दुसऱ्या लाटेत मात्र ढिल्ले पडलेले दिसले.

कोरोनाच्या नवनव्या विषाणूंचा उदय

काही संशोधकांच्या मते सध्या मोठ्या पातळीवर होत असलेल्या या संसर्गामागे कोरोनाच्या नव्या विषाणूंचा उदय हे प्रमुख कारण असू शकतं. हे नवे कोरोना विषाणू आधीच्या तुलनेत खूप वेगाने संसर्ग करत आहेत. आधी घरातील एखादा सदस्य कोरोना बाधित झाला तरी इतर सदस्य बाधित आढळण्याचं प्रमाण कमी होतं. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत घरातील एका सदस्याला कोरोनाची बाधा झाली तर सर्वच कुटुंबीयांना कोरोना संसर्ग होत असल्याचं समोर येतंय.

भारतातील नव्या कोरोना रुग्णांमध्ये बहुतांश रुग्णांना नव्या कोरोना विषाणूची बाधा

भारतात नव्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये नव्या विषाणूने बाधित होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण सर्वाधिक आहे. B.1.1.7 या नव्या कोरोना विषाणूने पंजाबमध्ये धुमाकूळ घातलाय. हा सर्वात आधी ब्रिटनमध्ये सापडला होता. दुसरीकडे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात B.1.617 या विषाणूने थैमान घातलंय. हा विषाणू मागील वर्षी भारतात आढळला होता. हा विषाणू डबल म्युटेशन झालेला घातक विषाणू असून तो शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीलाही चकवा देतोय. सध्या जगातील जवळपास 20 देशांमध्ये या विषाणूने पाय पसरले आहेत.

पहिल्या लाटेत सावध असलेले नागरिक दुसऱ्या लाटेत बेसावध

पहिल्या लाटेत कोरोना नियंत्रणासाठी सावध असलेले नागरिक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बेसावध आणि अति आत्मविश्वासात राहिल्याचंही काही संशोधक सांगतात. त्यात कोरोना लसीचा शोध लागल्यानंतर तर नागरिकांमधून अधिक बेजबाबदार वर्तन पाहायला मिळालं. त्यातूनही कोरोना संसर्गाला गती मिळाली. जेथे लोक एकत्र आले आणि फिरले तेथे कोरोना संसर्गाला पोषक वातावरण तयार झालं. यात राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रम आणि लग्न सोहळे अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे, असंही संशोधक नमूद करतात.

हेही वाचा :

कोरोनाचे नियम मोडताय, दंड न भरल्यास प्रशासन थेट मालमत्तेवर बोजा चढवणार

पुण्यात आतापर्यंत एकट्या ससूनमध्येच अडीच हजार रुग्णांचा मृत्यू; वाचा, कारण काय?

‘भारतात बेड्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा’, बिघडलेल्या परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय माध्यमं काय म्हणतात? वाचा…

व्हिडीओ पाहा :

Scientist and researcher shocked by community infection of Corona in India