आमच्या भागातून चालते व्हा…बलुचिस्तानसोबत हा प्रांतही हातचा जाणार? स्वातंत्र्यदिनीच पाकिस्तानला खतरनाक ‘गिफ्ट’
Baluchistan- PoK : पाकिस्तान किती तुकड्यात विभागला जाईल याचा अंदाज तिथल्या जनतेलाही आला आहे. अनेक प्रांताला स्वातंत्र्याची स्वप्न पडू लागली आहे. असीम मुनीर आणि शहबाज शरीफ यांच्यासमोर बलुचिस्ताननंतर अजून एक मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये जंबुरियत आणि आजादी चे नारे बुलंद झाले आहेत.

पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये (PoK) गेल्या दोन महिन्यांपासून पाकिस्तानी लष्कराला मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले आहे. पाक सैन्याने केलेले अत्याचारा चव्हाट्यावर आल्याने शेजारी देशाचे नाक कापल्या गेले आहे. आतापर्यंत भारताविरोधात पीओकेची ढाल वापरणाऱ्या पाकवरच त्याचा डाव उलटला आहे. विधानसभेत पाकिस्तान्यांसाठी आरक्षण आणि महागाईविरोधात पीओकेमध्ये जोरदार आंदोलन पेटले आहे. असीम मुनीर याच्या नेतृत्वातील लष्कर आणि शहबाज शरीफ यांचे सरकार समोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पाकच्या ताब्यातील काश्मीरमध्ये जंबुरियत आणि आजादीचे नारे घुमू लागले आहेत. आता तर पाक लष्कराला आमच्या प्रदेशातून चालते व्हा असे सुनावण्यात आल्याने पेच वाढला आहे. आज पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन आहे, त्याच दिवशी पाकला सुनावण्यात आले आहे.
आमच्या भागातून चालते व्हा
पीओकेमध्ये जनता रस्त्यावर उतरली आहे. संयुक्त अवामी ॲक्शन कमेटीचे प्रमुख सरदार अमान खान यांनी पाकच्या लष्कराला सुनावले आहे. आमच्या भूभागातून चालते व्हा. आता तुमचे काम संपले आहे. तुम्ही आमच्या भागात दिसता कामा नये असे त्यांनी पाक सैन्याला सुनावले. गुरुवारी रावलकोटमधील एका सभेला संबोधित करताना त्यांनी पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसीम मुनीर हा निर्लज्ज असल्याचे म्हणतं आता त्यांच्या सैन्याला काश्मीर सोडावे लागेल असे सुनावले.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रस्तावाची करून दिली आठवण
पाकव्याप्त काश्मीरमधील रावलकोटमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून उग्र प्रदर्शन करण्यात येत आहे. लष्कर आणि जनतेत मोठ्या प्रमाणात धुमश्चक्री उडाली आहे. अनेक ठिकाणी आंदोलक जबर जखमी झाले आहेत. त्याचवेळी सरदार खान यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रस्तावाचा आधार घेतला. 13 ऑगस्ट 1948 रोजीच्या UNCIP या ऐतिहासिक प्रस्तावाचा दाखला त्यांनी दिला. त्यात पाकिस्तानी लष्कर, पाकिस्तानी नागरिकांना काश्मीरमधून बाहेर जावे लागेल असे स्पष्टपणे नमूद असल्याचे ते म्हणाले. त्यांनी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीच पाक लष्कराला चालते व्हा असा इशारा दिला आहे. आता पाक लष्कर किती दिवसात गाशा गुंडाळणार हे त्यांनी निश्चित करावे. इतका बेशरम, निर्लज्ज लष्कर प्रमुख आम्ही अद्याप पाहिला नाही, अशी जहरी टीका त्यांनी असीम मुनीरवर केली. जवळपास 80 वर्षे उलटूनही पाकिस्तानी लष्कर आमच्या भागात काय करत आहे ? असा रोकडा सवाल त्यांनी केला.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या आठ दशकात पाक लष्कराकडून अत्याचार सुरू आहेत. बळजबरीने, जबरदस्तीने अनेक पाकिस्तानी इथं घुसले आहेत. त्यांना पीओकेचा ताबा हवा आहे. त्यांना काश्मीर संस्कृती आणि आदिवासी संस्कृती नष्ट करायची आहे. त्यांना उर्दू भाषा आमच्यावर लादायची आहे. आम्ही केवळ नावालाच स्वतंत्र आहोत. आमच्यावर पाकिस्तानची ही जबरदस्ती आता आम्हाला मंजूर नाही. पाकिस्तानने आमचा भूभाग लवकर खाली करावा, अन्यथा यापेक्षा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा सरदार खान यांनी दिला आहे. गेल्या 68 दिवसांपासून पाक लष्कर आणि स्थानिकांमधील कोंडी फुटलेली नाही.