लग्न सोहळ्यासाठी शाही बेत; हजारो लोकांना निमंत्रण पण वऱ्हाड फिरकलंच नाही, समोर आलं धक्कादायक कारण

एका जोडप्याच्या लग्नाला एकही पाहुणा आला नाही. हजारो आमंत्रणे पाठवूनही लग्न सोहळा पूर्णपणे रिकामा राहिला. कुटुंबानं चौकशी केली असता धक्कादायक कारण समोर आलं आहे.

लग्न सोहळ्यासाठी शाही बेत; हजारो लोकांना निमंत्रण पण वऱ्हाड फिरकलंच नाही, समोर आलं धक्कादायक कारण
| Edited By: | Updated on: Dec 27, 2024 | 9:59 PM

लग्न सोहळा कुणाला आवडत नाही? या निमित्ताने लोक एकत्र येतात. एकमेकांच्या गाठीभेटी होतात. गप्पा मारतात. आता तर सोशल मीडियाचा जमाना असल्याने सोशल मीडियावर लग्नाचे अजब गजब व्हिडिओ व्हायरल होतात. विशेष म्हणजे लग्नाला आलेले पाहुणेच हे व्हिडिओ काढून व्हायरल करत असतात. पण एखाद्या लग्नात पाहुणाच आला नाही तर? एका लग्नात असंच घडलंय. लग्नात पंच पक्वान्न होते. डोळे दिपवणारी रोषणाई होती. अख्ख्या गावाला लग्नाचं निमंत्रण होतं. पण लग्नाला एकही पाहुणा आला नाही. काय झालं असं?

चीनमधील एका लग्नाची ही गोष्ट आहे. चीनमधील एका कुटुंबाने गावातील एक हजार लोकांना लग्नाचं आमंत्रण दिलं. पण एकही व्यक्ती लग्नाला आला नाही. कुणीही लग्नाच्या सोहळ्यात सामील झाला नाही. एरव्ही लग्नात लोक नवरा नवरीला भेटण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लोक तास न् तास वाट पाहतात. नवरा नवरीसोबत फोटो काढतात. पण या लग्नात उलटंच घडलं. पाहुणेच आले नाही म्हणून नवरा नवरीने लग्न लावून घेतलं. त्यानंतर तासभर तरी पाहुण्यांची वाट पाहिली. पण कोणीच आलं नाही.

सर्व वाया गेलं

लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी या कुटुंबाने जेवणाचा मोठा बेत ठेवला होता. चिकन, मटणापासून सर्व प्रकारचे पदार्थ ठेवले होते. लग्नासाठी सुंदर डेकोरेशन केलं होतं. टेबल खुर्च्या लावल्या होत्या. अप्रतिम नियोजन केलं होतं. पण लग्न झालं तरी खुर्च्या रिकाम्या होत्या. फूड काऊंटर खाली होतं. एकही व्यक्ती लग्नात आला नाही. कुणीही फिरकला नाही. सर्व काही वाया गेलं. अख्खं जेवणंच वाया गेलं.

म्हणून पाहुणे आले नाही

चीनच्या या गावातील ही व्यक्ती लहानपणापासूनच कुटुंबासोबत गावाच्या बाहेर राहत होता. त्याने गावाशी संबंध ठेवला नव्हता. कधी सुट्टीतही गावाकडे आला नव्हता. गावातील लोकांना कधी भेटला नव्हता. त्यांच्याशी कधी गप्पा मारल्या नव्हता. पण लग्न करताना मात्र त्याने गावाला जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लग्न करण्यासाठी नवरदेव नवरी गावात आले. गावात वेडिंग पार्टीचं आयोजनही केलं. पण गावातून एक माणूसही लग्नाकडे फिरकला नाही. त्यामुळे नवरदेव आणि नवरीच्या घरचे हैराण झाले. नवरीच्या आईने जेव्हा घरा घरात जाऊन तुम्ही लग्नाला का आला नाहीत? अशी चौकशी केली तेव्हा लोकांनी दिलेलं उत्तर धक्कादायक होतं.

नवरदेवाच्या कुटुंबाचा गावाशी काहीच संपर्क राहिलेला नाही. हे लोक गावात होणाऱ्या लग्नालाही येत नसत. त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या पार्टीला न जाण्याचा गावाने निर्णय घेतला, असं या गावकऱ्यांनी नवरीच्या आईला सांगितलं. तेव्हा त्यांना धक्काच बसला. आता या लग्नाची जोरात चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यात रिकाम्या खुर्च्या दिसत आहे. विशेष म्हणजे ही घटना एक वर्षापूर्वीची आहे. पण आता ती पुन्हा चर्चेत आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us