‘या’ देशात 5 लाख लोकांचा बळी, आता कुपोषणाचं संकट, भारताचा मदतीचा हात

| Updated on: Mar 03, 2021 | 9:31 PM

जगभरात युद्धजन्य परिस्थिती तयार झालेल्या देशांच्या उद्ध्वस्त होण्याच्या गोष्टी अंगावर काटा आणतात. या युद्धांमध्ये अरब देशांमधील घटना आघाडीवर आहेत.

या देशात 5 लाख लोकांचा बळी, आता कुपोषणाचं संकट, भारताचा मदतीचा हात
Follow us on

दमास्कस (सीरिया) : जगभरात युद्धजन्य परिस्थिती तयार झालेल्या देशांच्या उद्ध्वस्त होण्याच्या गोष्टी अंगावर काटा आणतात. या युद्धांमध्ये अरब देशांमधील घटना आघाडीवर आहेत. यातीलच एक देश असलेल्या सीरियात तयार झालेल्या गृहयुद्धाच्या स्थितीत आतापर्यंत जवळपास 5 लाख लोकांचा मृत्यू झालाय. यात बहुसंख्य लहान मुलांचा समावेश आहे. अशा भयानक स्थितीत आता या देशात कुपोषणाची स्थिती तयार झालीय. त्यामुळे अनेकांचा जीव टांगणीला लागलाय. अशात भारताने माणुसकीच्या नात्याने सीरियाला मदतीचा हात पुढे केलाय. भारताने सीरियाला कुपोषणापासून वाचण्यासाठी 2000 मेट्रिक टन तांदूळ दिला आहे (Death of 5 lakh citizens in Syria now India provide 2000 metric ton rice amid food shortage).

अरब देशांमध्ये 2011 मध्ये अरब क्रांतीची सुरुवात झाली. याचं रुपांतर नंतर अराजक परिस्थितीत झालं. त्यामुळे अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार झाली. आता इतक्या वर्षांनी काही देशांमधील ही युद्धजन्य परिस्थिती संपली आहे. मात्र, सीरियात आजही परिस्थिती आणखी वाईटच होताना दिसत आहे. सीरियात मागील दशकभरापासून गृहयुद्ध सुरु आहे. यात आतापर्यंत जवळपास 5 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागलाय.

सीरियात अन्नधान्याचाही तुटवडा, कुपोषणाची वेळ

सीरियातील हे युद्ध कधी थांबणार हे कुणालाही माहिती नाही. मात्र, एकिकडे युद्ध सुरु असताना आता सीरियात अन्नधान्याचाही तुटवडा तयार झालाय. अमेरिका आणि युरोपीयन युनियनने आधीच निर्बंध लादलेल्या सीरियावर आता कुपोषणामुळे मोठं संकट ओढावलं. अशावेळी भारताने सीरियाला मदतीचा हात दिलाय. भारताने युद्धात होरपळत असलेल्या सीरियाला 2000 मेट्रिक टन तांदूळ दिलाय. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत भारताने हा निर्णय घेतलाय.

भारताकडून सीरियाला दोन टप्प्यात 2 हजार मेट्रिक टन तांदूळ

भारताकडून सीरियाला पहिल्या तांदळाच्या खेपेत 1000 मेट्रिक टन तांदूळ 12 फेब्रवारी रोजी मिळाला. त्यानंतर 18 फेब्रुवारीला दुसऱ्या खेपेत सीरियाला आणखी 1000 मेट्रिक टन तांदूळ पोहचला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याला दुजोरा दिला आहे. सीरियाने भारताकडे आपातकालीन मानवाधिकार मदत मागितली होती. त्यानंतर भारताने हा निर्णय घेतला.

सीरियात 2011 पासून युद्ध

सीरियामध्ये 18 मार्च 2011 मध्ये अरब क्रांती दरम्यान ग्रृहयुद्धाची परिस्थिती तयार झाली. सुरुवातीला नागरिकांनी तत्कालीन सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांच्याविरोधात मोठं आंदोलन उभं केलं. मात्र, नंतर या प्रश्नात अमेरिकेसह इतर अनेक पाश्चिमात्य देशांनी उडी घेतली. असद यांनी 2000 मध्ये आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर सीरियाचं अध्यक्षपद घेतलं. त्यांच्या वडिलांनी सीरियावर 30 वर्षे राज्य केलं होतं.

आज सीरियातील अनेक शहरं उद्ध्वस्त झालीत. येथील अनेक लोकांना आपलाच देश सोडण्याची वेळ आलीय, तर अनेकांना आपलं मूळ ठिकाण सोडून इतर ठिकाणी विस्थापित व्हावं लागलं. युद्ध थांबवण्याच्या सर्वच उपाय अपयशी ठरलेत.

जगातील प्रत्येक पाचवा विस्थापित नागरिक सीरियाचा

23 एप्रिल 2016 रोजी संयुक्त राष्ट्राने आणि अरब लीगने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, सीरियात भूकबळी आणि युद्धात जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 81 हजार 612 इतकी आहे. यात सर्वात जास्त संख्या मुलांची आहे. सीरियाने जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, जवळपास 4,00,000 लोक युद्धात मारले गेलेत. सप्टेंबर 2015 पर्यंत जवळपास 40 लाख 10 हजार लोकांनी आपला देश सोडून इतर देशांमध्ये आसरा घेतलाय. 60 लाख 50 हजार लोकांना देशांतर्गत इतर ठिकाणी विस्थापित व्हावं लागलंय. जगात विस्थापित होणाऱ्या नागरिकांपैकी प्रत्येक 5 वा व्यक्ती सीरियाचा आहे.

हेही वाचा :

एका गोळीनं उडवले ISISचे 5 दहशतवादी, ब्रिटिश SAS स्नायपरची कमाल

Special Story : अफगाणिस्तान, सीरियात जे पेरलं तेच अमेरिकेत उगवलं? फोडा आणि राज्य करा

PHOTO | पर्यटनासाठी सर्वात धोकादायक असलेले 14 देश, ‘या’ देशांमध्ये अजिबात फिरायला जावू नका

व्हिडीओ पाहा :

Death of 5 lakh citizens in Syria now India provide 2000 metric ton rice amid food shortage