युद्ध सुरू असताना रशिया संकटात, 3 लाख लोक अडकले, थेट आणीबाणीची घोषणा

Russia in Trouble : रशियावर निसर्गाची अवकृपा पहायला मिळत आहे. युक्रेन युद्धात अनेक वर्षे अडकलेल्या रशियावर आता नवीन संकट कोसळलं आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

युद्ध सुरू असताना रशिया संकटात, 3 लाख लोक अडकले, थेट आणीबाणीची घोषणा
Flood in Russia
Image Credit source: Google
| Updated on: Mar 29, 2026 | 3:05 PM

आखाती प्रदेशात सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे, त्याचबरोबर रशियादेखील युक्रेनसोबतच्या युद्धात व्यस्त आहे. अशातच आता रशियावर निसर्गाची अवकृपा पहायला मिळत आहे. युक्रेन युद्धात अनेक वर्षे अडकलेल्या रशियावर आता नवीन संकट कोसळलं आहे. देशाच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी वीजपुरवठाही पूर्णपणे खंडित झाला आहे. त्यामुळे पुतीन सरकारची डोकेदुखी वाढली आहे, सरकारला काही भागात आणीबाणी जाहीर करावी लागली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

निसर्ग कोपला…

समोर आलेल्या माहितीनुसार, दक्षिण रशियातील दागेस्तान प्रदेशात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. या प्रदेशाची राजधानी माखाचकला येथे परिस्थिती बिघडल्याने प्रशासनाने आणीबाणी जाहीर केली आहे. सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठा खंडित झाला आहे. आपत्कालीन सेवांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे, प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू आहे. गरजू लोकांना सर्वतोपरी मदत दिली जात असल्याची माहिती प्रशासनाकडून दिली जात आहे.

3.27 लाख लोक संकटात

दागेस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे 2.83 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या 283 वस्त्यांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. एकूण 3.27 लाखांहून अधिक लोक वीज संकटाचा सामना करत आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पिण्याचे पाणी, संपर्क व्यवस्था आणि इतर मूलभूत सेवांमध्येही अडचणी निर्माण झाल्या आहेत. दागेस्तानचे प्रमुख सर्गेई मेलिकोव्ह यांनी म्हटले की, प्रशासनाने आधीच खराब हवामानाचा अंदाज घेऊन तयारी केली होती, मात्र आता परिस्थिती अपेक्षेपेक्षा खूपच गंभीर बनली आहे. त्यामुळे मदतकार्यासाठी अधिक संसाधनांची गरज भासत आहे.

रेल्वे वाहतुकीवरही परिणाम

मुसळधार पावसामुळे आणि पूरामुळे खासाव्युर्तमध्ये पायाभूत सुविधांचेही नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे एका रेल्वे पूलाचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे रेल्वे वाहतूक प्रभावित झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे हवामान विभागाने रविवारीपर्यंत या भागात मुसळधार पाऊस सुरू राहू शकतो, असा इशारा दिला आहे, त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

Follow Us