Galwan Clash : गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याला डोळे दाखवणाऱ्या चिनी सैनिकालाही कंठस्नान

| Updated on: Feb 19, 2021 | 1:42 PM

नऊ महिन्यानंतर चीनने झटापटीत केवळ चारच जण मारले गेल्याचं म्हटलं आहे (Galwan Valley Clash China Soldier )

Galwan Clash : गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याला डोळे दाखवणाऱ्या चिनी सैनिकालाही कंठस्नान
पीएलएचा रेजिमेंटल नेता क्वी फबाओ (Qi Fabao)
Follow us on

बीजिंग : चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) पहिल्यांदाच लडाखच्या गलवान खोऱ्यात (Galwan Valley Clash) वर्षभरापूर्वी झालेल्या झटापटीत आपले सैनिकही ठार झाल्याची कबुली दिली आहे. पीएलएने म्हटले आहे की गेल्या वर्षी जूनमध्ये गलवान व्हॅलीमध्ये भारतीय सैन्य दलाच्या चकमकीत चार सैनिक ठार झाले होते. जवळपास नऊ महिन्यांनंतर चीनने कबुली दिली. चिनी सैन्याच्या मारल्या गेलेल्या सैनिकांमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत (एलएसी) भारतीय सैनिकांना धमकावणाऱ्या सैनिकाचाही समावेश आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये रक्तरंजित चकमकीत भारतीय जवानांनी या सैनिकाला ठार केले. (Galwan Valley Clash China admits PLA Soldier Qi Fabao killed by Indian Army)

पीएलएचा रेजिमेंटल नेता क्वी फबाओ

एलएसीवर तणाव निर्माण होण्यापूर्वी 15 जूनच्या मध्यरात्री भारत आणि चीनमधील सैनिक आमने-सामने आले होते. दोघांमध्ये झालेल्या झटापटीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोन्ही बाजूचे सैनिक एकमेकांशी वाद घालत असल्याचं दिसत होतं. यावेळी पीएलएचा रेजिमेंटल नेता क्वी फबाओ (Qi Fabao) भारतीय सैनिकांना अत्यंत आक्रमकपणे धमकावत होता. मात्र 15 जूनच्या मध्यरात्री भारतीय शूरवीरांनी त्याचा फुकाचा अभिमानच संपवला. भारतीय जवानांनी क्वीला सीमेवर कंठस्नान घातले. चीनने आता फबाओला ‘बॉर्डर गार्डिंग हिरो रेजिमेंटल कमांडर’ ही पदवी दिली आहे.

चारच जण मारले गेल्याचा दावा

चीनबरोबर झालेल्या हाणामारीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते. अमेरिकेच्या एका गुप्त अहवालात या हाणामारीत चीनचे 40 सैनिक मारले गेल्याचं म्हटलं होतं. मात्र, नऊ महिन्यानंतर चीनने या हल्ल्यात केवळ चारच जण मारले गेल्याचं म्हटलं आहे. भारतीय जवान नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी हा हल्ला झाल्याचा दावा चीनने केला आहे. तसेच भारताने नियंत्रण रेषेवर भारतीय जवानांची कुमक वाढवल्याचा दावा करतानाच चीनच्या सैनिकांचं या वृत्तात गुणगान करण्यात आलं आहे.

म्हणून वृत्त स्वीकारलं

सिंघुआ विद्यापीठातील नॅशनल स्ट्रॅटेजी इन्स्टिट्यूटच्या संशोधन विभागाचे संचालक कियान फेंग यांनी चीनने या घटनेविषयी माहिती का जाहीर केली आहे हे सांगितले. ते म्हणाले की, या खुलाशाद्वारे चीनला दिशाभूल करणारं वृत्त फेटाळून लावायचं आहे. ज्यात असं म्हटलं जातं की या घटनेत भारतापेक्षा चीनला जास्त त्रास फटका बसला होता.

45 वर्षात पहिल्यांदाच सीमेवर संघर्ष

मेच्या सुरुवातीलाच चीनच्या सैनिकांनी नियंत्रण रेषेवर जमावजमव सुरू केली होती. त्यामुळे भारतीय जवान सतर्क झाले होते. चीनच्या या आक्रमक पावित्र्यामुळे दोन्ही देशाच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्याचा परिणाम म्हणजे 15 जूनच्या मध्यरात्री दोन्ही सैनिकांमध्ये धुमश्चक्री उडाली. गलवान खोऱ्यातीही ही धुमश्चक्री म्हणजे गेल्या 45 वर्षातील दोन्ही देशांमधील अत्यंत भयंकर संघर्ष होता. या हाणामारीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते. तर चीनचे सैनिकही मोठ्या प्रमाणावर मारले गेले होते. मात्र, चीनने त्याला पृष्टी दिली नव्हती.

संबंधित बातम्या :

गलवान खोऱ्यात चार सैनिक मारले गेले, चीनने वर्षभरानंतर दिली कबुली

(Galwan Valley Clash China admits PLA Soldier Qi Fabao killed by Indian Army)