भारत-रशियादरम्यान रेल्वे धावणार? पुतीन सरकारची योजना काय? मोठी अपडेट समोर

India Russia Railway : रशियाने भारतापर्यंत माल पोहोचवण्यासाठी नवीन रेल्वे मार्ग तयार करण्याच्या योजनेवर विचार सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारत-रशियादरम्यान रेल्वे धावणार? पुतीन सरकारची योजना काय? मोठी अपडेट समोर
India Russia Train Project
Image Credit source: Google
| Updated on: Aug 09, 2026 | 7:23 PM

भारत आणि रशिया यांच्यातील व्यापारी संबंध आहेत, सध्या मोठ्या प्रमाणात दोन्ही देशांदरम्यान व्यापार केला जातो. अशातच आता रशियाने भारतापर्यंत माल पोहोचवण्यासाठी नवीन रेल्वे मार्ग तयार करण्याच्या योजनेवर विचार सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. रशियाचे उपपंतप्रधान मरात खुसनुलिन यांनी TASS वृत्तसंस्थेला एक मुलाखत दिली. यात त्यांनी सांगितले की, रशियापासून हिंदी महासागरापर्यंत थेट रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या शक्यतांचा शोध घेणे गरजेचे आहे. बोस्फोरस आणि होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे मालवाहतूक करताना निर्माण होणारे धोके लक्षात घेता पर्यायी मार्गांची गरज भासू शकते.

उपपंतप्रधान मरात खुसनुलिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाव्य रेल्वे मार्ग तुर्कमेनिस्तान, इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमार्गे भारतापर्यंत पोहोचू शकतो. असा मार्ग तयार झाल्यास रशियातून भारतात माल पाठवण्यासाठी समुद्री मार्गावरील अवलंबित्व कमी होऊ शकते. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारालाही चालना मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या हा केवळ एक प्रस्ताव आहे, या रेल्वे मार्गाच्या बांधकामाबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. कारण अनेक देशांमधून रेल्वे मार्ग तयार करणे सोपे काम नाही. त्यासाठी सर्व संबंधित देशांची सहमती, सुरक्षा व्यवस्था आणि विविध रेल्वे नेटवर्क एकमेकांना जोडण्याची आवश्यकता असेल. त्यामुळे या प्रस्तावावर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही.

रेल्वे नेटवर्कची गरज का?

गेल्या काही काळापासून आखाती देशात युद्धामुळे तणाव वाढला आहे. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये जहाजांच्या वाहतुकीचा धोका वाढला आहे. कारण होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल आणि गॅस वाहतूक मार्गांपैकी एक आहे. मोठ्या प्रमाणावर तेल आणि गॅस याच मार्गाने विविध देशांपर्यंत पोहोचवले जाते. या मार्गावर अडथळे निर्माण झाल्यास त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारावर होतो. त्यामुळे रशिया भारतापर्यंत पोहोचण्यासाठी जमिनीवरील मार्गाला पर्यायी पर्याय म्हणून पाहत आहे अशी माहिती समोर आली आहे.

रेल्वे नेटवर्कमुळे काय फायदा होणार? ?

रशिया आणि भारत आधीपासूनच इंटरनॅशनल नॉर्थ-साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरच्या माध्यमातून व्यापार वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. या कॉरिडॉरद्वारे रशियातून इराणमार्गे भारतापर्यंत माल पोहोचवण्याची योजना आहे. रशिया आणि इराणमधील रेल्वे संपर्क मजबूत करण्यावरही काम सुरू आहे. त्यामुळे नवीन प्रस्ताव हा याच व्यवस्थेला आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न मानला जाऊ शकतो.

भविष्यात रशियापासून भारतापर्यंत रेल्वेमार्ग तयार झाला तर दोन्ही देशांमधील मालवाहतूक अधिक वेगवान आणि सुलभ होऊ शकते. यामुळे भारत आणि रशियामधील व्यापारिक संबंध आणखी मजबूत होतील. मात्र, सध्या भारत-रशिया थेट रेल्वे सुरू करण्याबाबत कोणतीही निश्चित तारीख किंवा अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us