
पाकिस्तानातून मोठी बातमी. पाकिस्तान सध्या मान्सूनचा पाऊस आणि पुराच्या कहराशी झुंज देत आहे. देशात पाऊस आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे मृतांचा आकडा 700 च्या पुढे गेला आहे. याचा सर्वाधिक फटका पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांताला बसला असला तरी पुराचा पंजाबलाही मोठा फटका बसला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील या आपत्तीसाठी भारताला जबाबदार धरले जात आहे. सिंधू जल करार स्थगित झाल्यानंतर आलेल्या पुरासाठी पाकिस्तानी माध्यमांनी भारतातून सोडण्यात आलेल्या पाण्याला जबाबदार धरले आहे.
पाकिस्तानच्या समा टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पंजाबमधील रावी नदीला पूर आला आहे. भारतातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पाकिस्तानातील रावी नदी ओसंडून वाहत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारताच्या ज्या भागातून रावी नदी पाकिस्तानात प्रवेश करते, त्या भागातून 60 ते 61 हजार क्युसेक पाणी गेले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या भागातील रावी नदीचा पृष्ठभाग उंचावला आहे.
जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी नदीकाठचा भाग रिकामा केला आहे. सिंधू जल करारानुसार पाकिस्तानला सिंधू, झेलम आणि चिनाब या पश्चिमेकडील तीन प्रमुख नद्यांचे पाणी मिळते, तर पूर्वेकडील ब्यास, रावी आणि सतलज या तीन नद्यांचे पाणी वापरण्याचा अधिकार भारताला आहे.
दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने पूरग्रस्त भागात मदतकार्य तीव्र केले आहे. मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 706 झाली असून पावसामुळे आणि पुरामुळे मृतांचा आकडा 706 वर पोहोचला आहे, असे पाकिस्तानने मंगळवारी सांगितले. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) आपल्या ताज्या आकडेवारीत म्हटले आहे की, गेल्या 24 तासात आणखी 24 जणांचा मृत्यू झाला असून 26 जूनपासून मृतांचा आकडा 706 वर पोहोचला आहे. पूरजन्य घटनांमधील जखमींची संख्या 965 झाली आहे.
एनडीएमएच्या म्हणण्यानुसार, खैबर-पख्तूनख्वामध्ये आतापर्यंत 427 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर पंजाब प्रांतात 164, सिंधमध्ये 29, बलुचिस्तानमध्ये 22, पाकव्याप्त काश्मीरमध्ये 56 आणि इस्लामाबाद भागात 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी मंगळवारी सांगितले की, लष्कराने मदतकार्य तीव्र केले असून खैबर-पख्तुनख्वामधील नऊ छावण्यांमधून 6,903 लोकांना वाचवले आणि त्यांना वैद्यकीय मदत पुरवली.