
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा फटका आता भारतीयांनाही बसायला सुरुवात झाली आहे. सध्या इराण आणि इस्त्रायलच्या युद्धाचा फटका हवाई वाहतुकीला बसला आहे. यामुळे अनेक देशांनी आपली हवाई क्षेत्रे सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद केली आहेत. यामुळे फिरण्यासाठी, कामानिमित्त आणि शिक्षणानिमित्त गेलेले अनेक भारतीय परदेशात अडकले आहेत. आता या युद्धामुळे उत्तर प्रदेशातील एका कुटुंबाची चिंता वाढली आहे. बांदा जिल्ह्यातील कोतवाली परिसरातील नोनिया येथील सुदर्शन हा तरुण सध्या बहरीनमध्ये युद्धसदृश परिस्थितीत अडकला आहे. तो सुखरुप घरी यावा, यासाठी त्याच्या कुटुंबाकडून सरकारला वारंवार विनंती केली जात आहे.
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा वणवा आता थेट उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे. बांदामधील कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नोनिया परिसरात राहणारा तरुण सुदर्शन हा सध्या बहरीनमध्ये युद्धाच्या छायेखाली अडकला आहे. हॉटेल मॅनेजमेंटची स्वप्ने घेऊन परदेशात गेलेला हा तरुण सध्या क्षेपणास्त्रांच्या आवाजाने हादरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुदर्शन हा एक अत्यंत हुशार आणि कष्टाळू विद्यार्थी आहे. त्याने गोव्यातील एका प्रतिष्ठित संस्थेतून हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला. करिअरला उभारी देण्यासाठी तो ८ महिन्यांपूर्वी दोन वर्षांच्या इंटर्नशिपसाठी बहरीनला गेला. सुरुवातीचे काही महिने सर्व काही सुरळीत होते, मात्र अचानक सुरु झालेल्या युद्धामुळे तिथले वातावरण पूर्णपणे बदलून गेले आहे, अशी माहिती सुदर्शनच्या आईने दिली.
सुदर्शनची आई प्रियांका यांनी तिथल्या परिस्थितीची माहिती दिली आहे. सुदर्शनचे वडील आता या जगात नाहीत. त्यामुळे प्रियांका यांनीच मोठ्या कष्टाने त्याला लहानाचे मोठे केले. सुदर्शन सध्या बहरीनमध्ये सुरक्षित असला, तरी तिथल्या युद्ध पाहून तो मानसिकदृष्ट्या खचला आहे. सुदर्शनने आपल्या कुटुंबाला पाठवलेल्या व्हिडिओमध्ये युद्धाचा भयानक चित्रही कुटुंबाला दाखवले आहे.
त्याने पाठवलेल्या व्हिडीओत आकाशात उडणारी क्षेपणास्त्रे, त्यांचे होणारे स्फोट स्पष्टपणे दिसत आहेत. तसेच स्फोटांनंतर परिसरात काळा धूर पसरतो. यामुळे सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. जेव्हा जेव्हा क्षेपणास्त्र हल्ल्याचा धोका असतो, तेव्हा संपूर्ण शहरात सायरन वाजवला जातो. हा सायरन वाजताच सर्वांना जीव मुठीत धरुन हॉटेल किंवा सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागते, असेही त्याने पाठवलेल्या व्हिडीओत दिसत आहे.
सुदर्शनच्या आई सध्या बांदाबाहेर असून त्या उद्या संध्याकाळी पोहोचणार आहेत. मात्र, त्यांनी फोनवरूनच जिल्हा प्रशासनाला आपल्या मुलाची सर्व माहिती दिली आहे. माझा मुलगा तिथे सुरक्षित आहे, पण किती काळ सुरक्षित राहील याची शाश्वती नाही. त्यामुळे लवकरात लवकर त्याला भारतात परत आणावे,” अशी विनंती त्यांनी भारत सरकार आणि जिल्हा प्रशासनाला केली आहे. सध्या सुदर्शनचे मित्र आणि कुटुंब व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून त्याच्याशी सतत संपर्कात आहेत. त्याला धीर देण्याचे काम सुरू असले तरी परिसरात पडणारी क्षेपणास्त्रे पाहता संपूर्ण कुटुंब चिंतेच्या सावटाखाली आहे.