कुवैतला जाण्यासाठी निघाले आणि थेट पाकिस्तानात पोहोचले… 8 भारतीयांसोबत नेमकं काय घडलं?
मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या कराची विमानतळावर अडकलेल्या आठ भारतीय प्रवाशांच्या सुटकेसाठी नोर्का रूट्स आणि परराष्ट्र मंत्रालय प्रयत्न करत आहेत.

मध्यपूर्वेतील इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. या युद्धजन्य परिस्थितीचा फटका हवाई वाहतुकीला बसला आहे. यामुळे अनेक देशांनी आपली हवाई क्षेत्रे सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद केली आहेत. याचाच परिणाम म्हणून अझरबैजानहून कुवेतला जाणारे एअर अरेबियाचे एक विमान पाकिस्तानमधील कराची विमानतळावर उतरवावे लागल्याची घटना समोर आली आहे. हे विमान आणीबाणीच्या परिस्थितीत उतरवण्यात आले असून या विमानात ८ भारतीय प्रवासी अडकल्याचे पाहायला मिळत आहे. यात केरळमधील पलक्कड येथील एका कुटुंबाचा समावेश आहे.
नेमकं काय घडलं?
नोर्का रूट्स (Norka Roots) या केरळ सरकारच्या अनिवासी केरळी लोकांचे व्यवहार हाताळणाऱ्या संस्थेने नुकतंच याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पलक्कडचे रहिवासी कृष्णदास, त्यांच्या पत्नी डॉ. रेश्मी मेनन आणि त्यांची तीन वर्षांची मुलगी स्मृती मेनन हे अझरबैजानची राजधानी बाकूहून शारजाहमार्गे कुवेतला प्रवास करत होते. मात्र मध्यपूर्वेतील संघर्षामुळे अचानक हवाई मार्ग बंद झाला. यामुळे विमानाला कराचीकडे वळवण्यात आले.
या अडकलेल्या प्रवाशांना भारतात परत आणणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावपूर्ण संबंध आहेत. या दोन्ही देशांदरम्यान कोणतीही थेट हवाई वाहतूक सेवा नाही. त्यासोबतच कोणताही देश एकमेकांना आपल्या हवाई क्षेत्राचा वापर करण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे नोर्का रूट्सने भारतीय परराष्ट्र मंत्रालयाशी तातडीने संपर्क साधला आहे. प्रवाशांना कराचीहून थेट भारतात न आणता, कोलंबोमार्गे (श्रीलंका) भारतात परत आणू शकतो का, हा पर्याय अधिकाऱ्यांकडून विचारात घेतला जात आहे.
अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मदत मिळवण्याचा प्रयत्न
या प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांची सुटका सुनिश्चित करण्यासाठी नोर्का रूट्सने तत्परता दाखवली आहे. आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्यासाठी संस्थेने एक विशेष मदत कक्षही स्थापन केला आहे. तसेच भारतीय दूतावास पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रवाशांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान २८ फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्त लष्करी कारवाई करत इराणवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण मध्यपूर्वेत युद्धाची ठिणगी पडली आहे. या वाढत्या तणावामुळे अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी आपले मार्ग बदलले आहेत, तर काही देशांनी आपली हवाई हद्द बंद केली आहे. ज्यामुळे जगभरातील हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे.
