
Iran Israel War : मध्य-पूर्वेत इराण-इस्रायल यांच्यात चालू असलेल्या युद्धाचा संपूर्ण जगाने धसका घेतला आहे. या युद्धामुळे जगात इंधन तुटवडा निर्माण झाला आहे. त्याची झळ आता भारतालाही बसायला सुरुवात झाली आहे. कच्च्या तेलाचा भाव वाढला आहे. देशात सध्या घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवतो आहे. घरगुती गॅसची किंमतही 60 रुपयांनी वाढली आहे. याच कारणामुळे हे युद्ध लवकरात लवकर संपावे असे संपूर्ण जगातून आवाहन केले जात आहे. परंतु काहीही झाले तरी आम्ही माघार घेणार नाही, असे इराणने ठणकावून सांगितले आहे. अमेरिकेकडूनही इराणला गंभीर इशारे दिले जात आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना आता इराण सर्वात मोठा आणि धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. हा निर्णय एकदा घेतल्यास संपूर्ण जगात हाहा:कार माजण्याची शक्यता आहे.
इस्रायल आणि अमेरिका यांच्याकडून इराणवर हल्ले केले जात आहेत. आतापर्यंतच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये हजोर नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एका शाळेलाही लक्ष्य करण्यात आल्याने यात 80 पेक्षा जास्त शाळकरी विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच इस्त्रायल, अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी इराणने होर्मुझची खाडी बंद केली आहे. या खाडीमधून पश्चिम आशियाई तसेच इतर देशांना तेल तसेच नैसर्गिक वायूचा पुरवठा केला जातो. जगभरातील देशांना या युद्धाची झळ बसत असल्याने अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यावर दबाव येत आहे. होर्मुझची खाडी बंद केल्यानंतर जगात खळबळ माजलेली असताना आता इराण लवकरच बाब-अल-मानदेब नावाच्या महत्त्वाच्या सागरी मार्गालाही बंद करण्याच्या तयारीत आहे.
इस्रायल, अमेरिकेकडून आमच्यावर हल्ले चालूच राहिले तर आम्ही बाब-अल-मानदेब हा सागरी मार्गही बंद करू, असा इशारा इराणने दिला आहे. इराणच्या नवनिर्वाचित सर्वोच्च नेत्यावर अमेरिकेने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर या पर्यायाचा अवलंब केला जाण्याची दाट शक्यता आहे. बाब-अल-मानदेब ही एक सामुद्रधुनी आहे. ही सामुद्रधुनी अरुंद आहे. परंतु सागरी मार्ग म्हणून जहाजाच्या वाहतुकीसाठी ही सामुद्रधुनी खूपच महत्त्वाची आहे. हा मार्ग लाल महासागराला अदनच्या खाडीशी जोडतो. भूमध्य सागर आणि हिंद महासागराला जोडणाराही हा महत्त्वाचा मार्ग आहे.
त्यामुळेच इराणने ही सामुद्रधुनीदेखील बंद केल्यास जगात आणखी इंधनटंचाई होणार आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.