Explained : भारताकडे किती हजार कोटी लीटर तेलाचा राखीव साठा आहे? जगातल्या किती देशांकडून आपण तेल मागवतो?
Oil Crisis : मध्य पूर्वेत इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे जगात तेल संकट निर्माण होण्याचा धोका आहे. भारतातही तेलाच्या कमतरतेच्या भितीने धाबे दणाणले आहेत. केंद्र सरकारने तेल आणि गॅसची कमतरता जाणवू नये, यासाठी आवश्यक पावलं उचलली आहेत. पण भारताकडे किती हजार कोटी लीटर तेलाचा राखीव साठा आहे? जगातल्या किती देशांकडून आपण तेल मागवतो? स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून भारताचं किती टक्के तेल येतं? हे समजून घ्या.

इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिकेने पुकारलेल्या संयुक्त युद्धाचे आता जगावर हळूहळू परिणाम दिसू लागले आहेत. इस्रायल-अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचं मोठं नुकसान झालं आहे. इस्रायलमध्ये सुद्धा जिवीतहानीपेक्षा वित्तहानी जास्त झाली आहे. पण या युद्धात इराणने जे तंत्र अवलंबलय त्यामुळे ते आता जगाला एक भयानक संकटाच्या दिशेने घेऊन चालले आहेत. हे भयानक संकट आहे तेलाचं. इराणने आखाती देशातील तेल प्रकल्पांवर हल्ले केलेत. त्यामुळे काही देशांनी आपल्या प्रमुख तेल रिफायनरी बंद केल्या आहेत. स्ट्रेट ऑफ होर्मुज मधून वाहतूक करणाऱ्या तेल टँकर्सवर इराणकडून हल्ले होत आहेत. त्यामुळे त्या मार्गाने होणारी तेल वाहतूक जवळपास ठप्प आहे. आज हा लेख लिहित असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर प्रति तेलपिंप 85 डॉलरवर आहेत. काल सोमवारी हेच दर प्रति तेलपिंप 115 डॉलरपर्यंत पोहोचले होते. भविष्यात हे युद्ध असचं सुरु राहिलं, तर कच्चा तेलाचे दर भडकून प्रचंड महागाई वाढू शकते. तेलाचा हाच खेळ समजून घेऊया. ...
