ठाकरे गटाचे खासदार खरोखरच शिंदे गटात जाणार? संजय राऊतांनी संपवला सगळा सस्पेन्स, म्हणाले पायघड्या घातल्या तरी…
शिवसेना ठाकरे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे की पक्षाचे सर्व खासदार सोबत असून, अमित शाह मुद्दाम फुटीची वावटळ निर्माण करत आहेत; तसेच त्यांनी केंद्रीय यंत्रणांवरही जोरदार टीका केली.

शिवसेना ठाकरे गटाचे सर्व खासदार पक्षासोबत अत्यंत मजबुतीने उभे असून कुणीही कुठेही जात नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ही एक ठरवून केलेली रणनीती आहे की मुद्दाम एखादी वावटळ निर्माण करायची आणि पक्षात फूट पडल्याच्या अफवा पसरवायच्या,” असा थेट आणि घणाघाती आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील खासदार शिंदे गटाच्या, भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच हे सर्व खासदार लवकरच या गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहेत. आता या सर्व चर्चांवर संजय राऊत यांनी पूर्णविराम लावला आहे. त्यांनी आज माध्यमांसमोर पक्षाची अधिकृत भूमिका मांडली आणि विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.
खासदार फुटण्याच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही
“आमच्या सर्व खासदारांशी आमचा नियमित संवाद सुरू आहे. स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील सर्व खासदारांच्या थेट संपर्कात आहेत. ज्यांना पक्ष सोडून जायचे होते, ते आधीच गेले आहेत. आता देशात किंवा राज्यात लगेच निवडणुका नाहीत. लोकसभेच्या निवडणुकांना अजून ३ वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे. त्यामुळे खासदार फुटण्याच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही”, असे संजय राऊत म्हणाले.
३५-४० वर्षे पदे उपभोगली, पण…; राऊतांचा बंडखोरांवर घणाघात
ज्यांना फुटायचे असते ते कोणत्याही परिस्थितीत फुटतात. तुम्ही त्यांना कितीही सन्मान दिला, पायघड्या घातल्या, तरीही बेईमानीची मानसिकता असलेला किडा एकदा संपूर्ण शरीरात शिरला की तो माणसाचे मन आणि मेंदू दोन्ही पोखरून टाकतो. मग अशा लोकांनी पक्षात ३५ ते ४० वर्षे कितीही मोठी पदे उपभोगलेली असोत, ते निष्ठा राखू शकत नाहीत, असे घणाघातही संजय राऊत यांनी केला.
यावेळी संजय राऊतांनी देशातील सध्याच्या राजकीय फोडाफोडीच्या संस्कृतीला संजय राऊत यांनी थेट केंद्रीय यंत्रणा आणि घटनात्मक संस्थांना जबाबदार धरले आहे. देशात सध्या ज्या प्रकारे सत्ता आणि शक्तीचा वापर करून पक्ष फोडण्याचे राजकारण सुरू आहे, त्याला देशाचे पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, निवडणूक आयोग, ईडी (ED), सीबीआय (CBI) आणि खुद्द न्यायालय जबाबदार आहे. जोपर्यंत या देशातील सर्वोच्च आणि स्वायत्त संस्था निष्पक्षपणे काम करत नाहीत, तोपर्यंत सत्ताधाऱ्यांकडून अशीच राजकीय तोडफोड सुरू राहील, असे संजय राऊत म्हणाले.
कुणी पक्ष सोडत नाही
दरम्यान यावेळी संजय राऊतांना खासदार विनायक राऊत यांच्याशी दुसऱ्या गटाकडून संपर्क साधला जात असल्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्यांनी म्हटले, विनायक राऊत यांच्याशी जर कुणी संपर्क साधत असेल तर साधू द्या, त्यात काहीही चुकीचे नाही. राजकारणात संवाद सुरूच असतो. संवाद साधला म्हणजे कुणी पक्ष सोडत नाही. आमचे सर्व सहकारी उद्धव ठाकरेंसोबतच राहतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
