हवेच्या वेगाने पाणी आलं अन् सर्वच वाहून नेलं… पावसाचा थेंबही नाही, तरीही नेपाळमध्ये जलप्रलय Video

नेपाळमध्ये, विशेषतः रसुवा जिल्ह्यात, पाऊस नसतानाही तिबेटमधून आलेल्या पाण्यामुळे भीषण जलप्रलय आला आहे. हवेच्या वेगाने आलेल्या पुरामुळे पूल, टॉवर, इमारती आणि संपूर्ण गावे वाहून गेली आहेत. या अनपेक्षित महापुराने मोठे नुकसान झाले असून, स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवेच्या वेगाने पाणी आलं अन् सर्वच वाहून नेलं... पावसाचा थेंबही नाही, तरीही नेपाळमध्ये जलप्रलय Video
Nepal flood
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 26, 2026 | 4:54 PM

कडक्याचं ऊन पडलेलं असताना, पावसाचा एकही थेंब नसताना नेपाळमध्ये जलप्रलय आला. कधीही कुणीही पाहिला नसेल असा महाभयंकर जलप्रलय झालाय. या जलप्रलयाचे दृश्य पाहून अनेकांच्या काळजात धस्स होतंय. हवेच्या वेगाने पाणी आलं अन् पूल, टॉवर, इमारतीसहीत सर्वच वाहून नेलं. गावच्या गावं वाहून गेली. घरं, जनावरं आणि माणसंही वाहून गेली. काहीच शिल्लक राहिलं नाही. शिल्लक आहे ते फक्त पाणी आणि गाळ. नागरिकांचा आक्रोश आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू. ज्या ज्या ठिकाणाहून पाणी वाहून गेलंय, तिथे फक्त उरल्यात उद्ध्वस्ततेच्या खूणा. या महाभयंकर जलप्रलयाचे असंख्य व्हिडीआ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यावर कापरे भरल्याशिवाय राहणार नाही, इतकं भीतीदायक दृश्य आहे.

 

तिबेटने वाट लावली…

तिबेटमधून आलेल्या या महापुरामुळे नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. या जिल्ह्यात संपूर्ण दाणादाण उडाली आहे. हवेचा जेवढा वेग असतो त्या वेगाने नेपाळमध्ये पाणी आलं. येथील लेन्दे खोला (भाटेकोशी नदी)ला एवढा पूर आलाय की नदीचं असं रौद्ररूप पूर्वी कुणी कधीच पाहिलं नसेल. या नदीचं पाणी गावागावात घुसलं. त्यामुळे टिमुरे बाजार आणि रसुवाच्या सीमावर्ती भागात कस्टम विभागाचं मोठं नुकसान झालं आहे. पाण्याबरोबर वाहने आणि इतर सामान काडी कचऱ्यासारखं वाहून गेलं आहे. या महापुरामुळे वस्त्यांचं तर नुकसान झालंच, पण जलविद्यूत परियोजनेलाही मोठा फटका बसला आहे.

 

सकाळी 9 वाजता काळ आला

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9 वाजता तिबेटमधून अचानक महापूर आला. हा महापूर इतका महाभयानक होता की सर्व सामान वाहून गेलं. घरंदारं, जनावरं आणि माणसंही वाहून गेली. काहीच उरलं नाही, असं स्थानिकांनी म्हटलंय. पाण्याचा फ्लो अचानक वाढल्याने रसुवा जिल्ह्यातील तिमुरे आणि समीपवर्ती स्याफ्रुबेसी परिसरात मोठं नुकसान झालं. पाण्याबरोबर सर्वच साधन संपत्ती गेली. इमारती, पूल आणि टॉवरही वाहून गेल्याचं नेपाळी सैन्याचं म्हणणं आहे.

 

5 जिल्ह्यांवर हाय संकट

रसुवा जिल्हा हा काठमांडूच्या उत्तर पूर्वेला आहे. या जिल्ह्यापासून तिबेटची सीमा केवळ 125 किलोमीटर दूर आहे. नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती विभागाने रसुवा, नुवाकोट, धादिंग, चितवन आणि गोरखा नदीच्या किनारी राहणाऱ्या नागरिकांना पुढील आदेश येईपर्यंत सतर्क राहण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश दिले आहेत. नेपाळच्या एकूण पाच जिल्ह्यांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आले आहेत.

Follow Us