Nepal Flood: 4000 फूट खाली कोसळला 2 हजार फूट रुंद बर्फाचा डोंगर; नेपाळच्या महाप्रलयाची Inside Story

Nepal Flood: नेपाळमधील उंच पर्वतावरील हिमनदीतून 2000 फूट रुंदीचा बर्फाचा एक तुकडा 4000 फूट खाली कोसळला. या महाप्रलयामुळे नेपाळचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Nepal Flood: 4000 फूट खाली कोसळला 2 हजार फूट रुंद बर्फाचा डोंगर; नेपाळच्या महाप्रलयाची Inside Story
Nepal Flood: नेपाळच्या महाप्रलयामागे नेमकं काय?
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 27, 2026 | 12:57 PM

नेपाळ-तिबेट सीमेवर बुधवारी आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. सुरुवातीला ही आपत्ती भूकंपामुळे झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, सॅटेलाइट छायाचित्रे आणि तज्ज्ञांच्या विश्लेषणातून या महाप्रलयामागे ग्लेशियर कोसळण्याची घटना असल्याचं समोर आलं आहे. या घटनेची सुरुवात नेपाळमधील लांगटांग लिरुंग पर्वताच्या उत्तरेकडील भागातून झाल्याचं समोर आलं आहे. नेपाळ-चीन सीमेवरील रसुवा जिल्ह्यात अचानक आलेल्या पाण्याच्या आणि मलब्याच्या प्रचंड लोंढ्याने रस्ते, पूल, घरं आणि इतर पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं.

23,733 फूट उंच पर्वतावर नेमकं काय घडलं?

काठमांडूपासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर असलेला लांगटांग लिरुंग पर्वत तब्बल 7,234 मीटर म्हणजेच 23,733 फूट उंच आहे. या पर्वताच्या सुमारे 17 हजार फूट उंचीवरील भागातून जवळपास 2 हजार फूट रुंद म्हणजेच अर्ध्या किलोमीटरपेक्षा मोठा बर्फाचा तुकडा तुटला. हा महाकाय बर्फ आणि त्यासोबतचा खडक-मातीचा मलबा तब्बल 4 हजार फूट खाली घाटीत कोसळला.

इतक्या मोठ्या वस्तुमानाच्या कोसळण्यामुळे निर्माण झालेली ऊर्जा प्रचंड होती. या घटनेमुळे 5.2 तीव्रतेच्या भूकंपासारखे कंपन जाणवले. याच कारणामुळे सुरुवातीला ही घटना भूकंप असल्याचा संशय निर्माण झाला होता. मात्र, उपलब्ध पुराव्यांनुसार ग्लेशियरचा कोसळलेला भाग आणि त्यानंतरचा मलब्याचा प्रवाह ही आपत्तीची प्रमुख कारणं मानली जात आहेत.

बर्फाचा लोंढा नदीत मिसळला अन्..

ग्लेशियरचा तुकडा खाली कोसळल्यानंतर बर्फ, दगड, माती आणि पाण्याचा प्रचंड लोंढा तयार झाला. हा लोंढा तब्बल 100 फूट उंचीच्या लाटेसारखा पुढे सरकत त्रिशुली नदीत मिसळला. नेपाळचा डोंगराळ आणि अरुंद भूभाग असल्यामुळे या मलब्याच्या प्रवाहाचा वेग आणखी वाढला. काही मिनिटांतच हा लोंढा नदीच्या प्रवाहातून खालील वस्त्यांकडे पोहोचला आणि मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला. या घटनेदरम्यान मलब्यामुळे नदीचा प्रवाह काही काळ अडवला गेला. त्यामुळे पाणी साचून तात्पुरता जलाशय तयार झाला आणि तो फुटल्यानंतर पाणी, चिखल आणि मोठमोठे दगड प्रचंड वेगाने पुढे आले. त्यामुळे फ्लॅश फ्लडची तीव्रता आणखी वाढली.

150 हून अधिक लोकांचा मृत्यू

गुरुवार सकाळपर्यंत अधिकृत मृतांचा आकडा 160 वर गेला आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. रात्रभर नवलपरासी जिल्ह्यातून 200 किलोमीटर खालच्या दिशेने वाहणाऱ्या नारायणी नदीत मानवी आणि प्राण्यांचे मृतदेह तसंच ढिगारे तरंगताना दिसत होते. नेपाळचा नुवाकोटमधील प्रतिष्ठित 25 मेगावॅट क्षमतेचा ग्रिड-स्केल सौर ऊर्जा प्रकल्प चिखलाखाली गाडला गेला. पायाभूत सुविधा आणि मालमत्तेच्या नुकसानीचा अंदाज अब्जावधी डॉलर्समध्ये आहे.

Follow Us