
पहलगाममध्ये अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तहणाव प्रचंड वाढला आहे. भारताच्या प्रत्येक खेळीकडे पाकिस्तानच नव्हे तर जगाचं लक्ष लागलं आहे. इस्लामाबाद पासून दिल्लीपर्यंत आणि अमेरिकेपासून रशियापर्यंत एकच सवाल केला जातोय, तो म्हणजे भारत पाकिस्तानवर हल्ला करणार का? अमेरिकेतील लोकप्रिय दैनिक न्यूयॉर्क टाइम्सने तर संरक्षण तज्ज्ञांच्या हवाल्याने एक रिपोर्टच प्रसिद्ध केला आहे. त्यात भारत पाकिस्तानवर कशा पद्धतीने हल्ला करणार याची माहिती दिली आहे.
या रिपोर्टमध्ये दोन्ही देशांकडे असलेल्या हत्यारांची तुलना करण्यात आली आहे. त्यावरून भारताचं पुढचं पाऊल काय असेल यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये द रेजिडेंट फ्रंट नावाच्या दहशतवादी संघटनेने 26 लोकांची गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानचं पाणी तोडलं आहे. तसेच पाकिस्तानबाबत पाच मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे पाकिस्तान बॅकफूटवर आहे.
न्यूयॉर्क टाइम्समध्ये दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानशी युद्ध करण्याऐवजी दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा भारताकडून प्रयत्न केला जाईल. भारताचे सैन्य 2016 आणि 2019 प्रमाणे पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राईक करू शकते.
भारत आधी आर्थिकदृष्ट्या पाकिस्तानला कमजोर करत आहे. कारण येत्या काळात पाकिस्तानने युद्धाचा विचारही करू नये, हे त्यामागचं कारण असल्याचं न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलं आहे. या वृत्तात दोन्ही देशांना अण्वस्त्र सज्ज देश म्हटलं आहे. तसेच दोन्ही देशात युद्ध भडकले तर ते जगासाठी खतरनाक असेल, असंही या वृत्तात म्हटलं आहे. भारताचे सैन्य केवळ पीओकेपर्यंतच आपली कारवाई मर्यादित ठेवेल. त्यातून दहशतवाद्यांवर कारवाईही करता येणार आहे आणि युद्ध लढण्याची वेळही येणार नाही, यावर भारताचा भर असणार असल्याचं बातमीत म्हटलं आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कूटनीतीक मात देण्यासाठी सिंधु जल करार तोडली आहे. भारत पाकिस्तानला सिंधु नदीचं एक थेंब पाणीही देणार नाही. त्याशिवाय भारताने अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंधु जल करार तोडल्याने त्याचा पाकिस्तानच्या 17 कोटी लोकांवर थेट परिणाम होणार आहे. सिंधुचं पाणी पाकिस्तानातील पंजाब आणि सिंध प्रांताला मिळत होतं. या ठिकाणी एकूण 17 कोटी लोक राहतात. सिंधुला पाकिस्तानची लाइफलाइन म्हटली जाते. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.