चोराच्या उलट्या बोंबा…पाकिस्तानने भारतावर लावला पुन्हा तो आरोप, जगासमोर छाती बडवली, पण कोणीच दखल नाही घेतली

Pakistan Big Allegation : आंतरराष्ट्रीय मंचावर पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान दहशतवाद्यांना रसद पुरवत असल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर आता पाकिस्तानच्या उलट्या बोंबा सुरू झाल्या आहेत. भारताला बदनाम करण्यासाठी पाकिस्तानने खास मोहिम आखली आहे. काय आहे अपडेट?

चोराच्या उलट्या बोंबा...पाकिस्तानने भारतावर लावला पुन्हा तो आरोप, जगासमोर छाती बडवली, पण कोणीच दखल नाही घेतली
पाकिस्तानचा नवीन कांगावा
Image Credit source: गुगल
| Updated on: May 04, 2025 | 11:20 AM

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान हाच दहशतवाद्यांना रसद पुरवत असल्याचे जागतिक मंचावर उघड झाले. पाकिस्तानची जगात नाचक्की होत आहे. या हल्ल्यात पाकिस्तानच्या लष्कराचे थेट संबंध असल्याचे उघड झाले आहे. कात्रीत सापडलेल्या पाकिस्तानने आता नवीन कांगावा सुरू केला आहे. भारतच पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया करत असल्याच्या उलट्या बोंबा पाकिस्ताने सुरू केला आहे. अर्थात त्यांच्या या कोल्हेकुईचा जागतिक मंचावर काहीच उपयोग झाला नाही. त्यांच्या या दाव्यावर कोणत्याच देशाने प्रतिक्रिया न दिल्याने पाकिस्तानी सरकार आणि लष्कराला चांगलीच चपराक बसली आहे.

पाकिस्तानचा आरोप काय?

पाकिस्तान लष्कराच्या जनसंपर्क विभागाचे प्रमुख आणि महासंचालक (DG ISPR) लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतावर आरोप केला. पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यामागे भारत असल्याचे खापर लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी फोडले. विशेष म्हणजे चौधरी यांनी हा हवेत गोळीबार केला. त्यांनी भारताने कोणता हल्ला घडवून आणला. त्याचा कसा या हल्ल्यांमागे हात आहे, याची माहिती दिली नाही. त्यांनी कोणताही पुरावा दिला नाही. भारतावर खापर फोडण्यासाठी आयोजित या पत्र परिषदेत चौधरी हेच घामाघूम दिसले. त्यांच्या बोलण्यात कोणतीही धार नव्हती. केवळ कोल्हेकुई करण्यासाठीच त्यांना ही पत्रकार परिषद घ्यावी लागल्याचे दिसून येत आहे.

भारतावर खोटे आरोप

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान ताण तणाव वाढला आहे. लेफ्टनंट जनरल चौधरी यांनी भारतावर खोटे आरोप लावले. भारत हा पाकिस्तानमध्ये प्रायोजित दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्यांनी केला. अर्थात त्यांनी या दाव्यासाठी कोणताही पुरावा सादर केला नाही. पहलगाम हल्ल्याला सात दिवस उलटून गेले आहे. पण भारताने या हल्ल्यासंबंधीचा एकही पुरावा अद्याप सादर केला नाही. पहलगाम हल्ल्यासंबंधीत सर्व आरोप निराधार असल्याचा कांगावा त्यांनी केला.

दहशतावाद्यांना भारताची रसद

महासंचालक चौधरी यांनी भारत, पाकिस्तानात दहशतवादी कारवाया करत असल्याची कोल्हेकुई केली. भारताकडून स्फोटकं, आयईडी आणि इतर घातक सामग्रीही दहशतवाद्यांना पुरवल्याचा आरोप त्यांनी केला. हे दहशतवादी पाकिस्तानमध्ये निष्पाप नागरिकांना लक्ष्य करत असल्याचे चौधरी म्हणाले. भारत प्रायोजित राज्यस्तरीय दहशतवाद पाकिस्तानमध्ये सुरू असल्याचा कांगावा त्यांनी केला. उलट भारताने सिंधू पाणी करार रद्द केला. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे, व्हिसा रद्द करण्याचे एकतर्फी आदेश लागू केल्याचा आरोप केला.