Ordinance Factory : सीमेवर तणाव, इकडे दारुगोळा कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द, काही तरी मोठं होणार?
Ordinance Factories Chanda : एक मोठी बातमी समोर येत आहे. सीमेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असतानाच दारूगोळा कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. काय आहे अपडेट?

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणल्या गेले आहेत. सीमेवर पाकिस्तानने तर युद्धाची तयारी केली आहे. त्यांचे सैनिक युद्धाभ्यास करत आहेत. तर रणगाडे पण नियंत्रण रेषेजवळ आणण्यात आले आहे. पाकिस्तानचे उताविळ नेत्यांनी भारत पाकिस्तानवर हल्ला करणार असल्याचे जाहीर केले आहे. पहलगाम हल्ल्याला आता 10 दिवस उलटून गेले आहेत. दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. सीमेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असतानाच दारूगोळा कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. काय आहे अपडेट?
Ordinance Factories मधील कर्मचार्यांच्या सुट्ट्या रद्द
भारत आणि पाकिस्तानात तणाव वाढला आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा येथील दारुगोळा कारखाना आणि मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील खमरिया ऑर्डिनन्स फॅक्ट्ररीत कार्यरत सर्व कर्मचारी, कामगारांच्या सुट्ट्या तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात मोठे काही घडण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. दारूगोळा कमी पडू नये यासाठी त्याचे उत्पादन सुरू राहावे यासाठी हे पाऊल टाकण्यात आल्याचे समोर येत आहे. म्यूनिशंस इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि संचालकांनी चांदा येथील कर्मचाऱ्यांना हे आदेश दिले आहेत.
तात्काळ कामावर रूजू व्हा
याविषयीचे परिपत्रक काढण्यात आले आहेत. त्यानुसार, सर्व प्रकारच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व कर्मचार्यांनी वेळ न दवडता लागलीच तात्काळ कामावर रूजू व्हावे. त्यांना कामावर हजेरी लावणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्व कर्मचार्यांना कोणतीही सबब, कारण न देता कामावर हजर राहावे लागेल. या महत्त्वपूर्ण परिस्थिती राष्ट्रीय आवश्यकतेनुसार, तुमचे योगदान निश्चित करावे लागेल. अत्यंत गरजेच्या स्थिती कर्मचार्यांना उपस्थितीपासून सूट, सवलत घेता येईल. पण त्यासाठी ते ठोस कारण असणे गरजेचे आहे.
आर्थिक वर्षातील उद्दिष्ट गाठायचे आहे
जबलपूर ऑर्डिनन्स फॅक्ट्री, खमरियाच्या अधिकारी आणि कर्मचार्यांच्या सुट्ट्या शुक्रवारी रद्द करण्याचे सांगण्यात आले. या आर्थिक वर्षात उत्पादनाचे उद्दिष्ट अधिक होते. एप्रिल महिन्यात हे उद्दिष्ट गाठता आले नाही. त्यामुळे हे उद्दिष्ट गाठण्यासाठी या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी अविनाश शंकर यांनी पीटीआय या वृत्त संस्थेला फोनवरून दिली.
