Vijay Mallya : माझ्यावर घोर अन्याय, मला घोटाळेबाज का म्हणता? माझे उरलेले पैसे मला कधी परत मिळणार, विजय माल्याची पोस्ट चर्चेत
Vijay Mallya : कर्ज झाल्यानंतर देशाबाहेर पळून गेलेला आरोप विजय माल्याची पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आहे. त्याने उलट सरकारकडे रिफंड मागितला असून आपल्यावर घोर अन्याय झालाय असं त्याचं म्हणणं आहे.

एकेकाळचा मद्यसम्राट म्हणून ओळखला जाणारा विजय माल्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. फरार असल्याचा त्याच्यावर जो ठपका पडलाय, त्यावर त्याने प्रतिक्रिया दिली आहे. माल्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अनेक पोस्ट केल्या आहेत. या पोस्टमधून त्याने तो निर्दोष असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचवेळी भारत सरकारच्या तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. माल्याचा सर्वात मोठा दावा त्याच्या डोक्यावर असलेलं कर्ज आणि त्याच्या वसूलीशी संबंधित आहे. बँकांचं जितकं कर्ज माझ्या डोक्यावर होतं, तपास यंत्रणांनी त्यापेक्षा दुप्पट वसूली केल्याचा दावा माल्याने केलाय. माझे उरलेले पैसे मला कधी मिळणार? असा प्रश्न त्याने X वर केलेल्या पोस्टमध्ये विचारला आहे.
विजय माल्याने मुंबई उच्च न्यायालयात प्रवर्तन निर्देशालयाने (ईडी) दाखल केलेल्या एका प्रतिज्ञापत्राचा हवाला दिला आहे. “न्यायालयाने माझ्यावर 6,203 कोटीचं कर्ज असल्याचं निश्चित केलं होतं. ईडीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वत: मान्य केलय की, 2021 मध्ये माझ्याकडून 14,131.60 वसूली करण्यात आली” असं माल्याने म्हटलं आहे. “घेतलेल्या कर्जापेक्षा जास्त रक्कम चुकवल्यानंतरही पाच वर्षांनी मला मीडियामध्ये घोटाळेबाज का म्हटलं जातय?” असा माल्याचा प्रश्न आहे. आपल्या पोस्टमध्ये माल्याने किंगफिशर एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांचा उल्लेख केला. ईडीने जप्त केलेल्या माझ्या संपत्तीतील 350 कोटी रुपये कर्मचाऱ्यांमध्ये वाटून टाकले. “बँकांनी जर माझ्याकडून कर्जापेक्षा जास्त रक्केमची वसूली केली आहे, तर मग मला माझा रिफंड परत मिळाला पाहिजे” अशी माल्याची मागणी आहे.
मी भारतात येणं टाळत नाहीय, तर..
पैशाच्या वसुलीशिवाय माल्याने परदेशात राहण्याची कारणं सुद्ध स्पष्ट केली आहेत. जे लोक त्याला फरार म्हणतात, त्यांना उत्तर देताना माल्या म्हणाले की, “मी माझ्या मर्जीने तिथे थांबलेलो नाही. मी 1992 पासून यूनायटेड किंगडमचा रहिवाशी आहे. सध्या कायदेशी अडचणींमुळे यूके सोडण्यावर बंदी आहे” भारत सरकारच्या सर्व दिखावू कारवाईचा हा परिणाम असल्याचा माल्याचा आरोप आहे. “सरकारने माझ्यावर घोर अन्याय केलाय. मी भारतात येणं टाळत नाहीय, तर कायदेशीर बंधनांमध्ये अडकलो आहे” असं माल्याचं म्हणणं आहे.
To all who believe in fair and proper accounting justice please see the following table. Do I still deserve the way I am berated by the media and referred to as a fraudster at the very outset of a journalist’s script ? Why not start asking when I will get my refund ? pic.twitter.com/oP80Ba5Nuw
— Vijay Mallya (@TheVijayMallya) September 8, 2026
म्हणून त्याला दिलासा मिळू शकत नाही
सरकारसोबतच न्यायालय सुद्धा माल्याच्या बाबतीत खूप कठोर आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने त्याला फटकारलेलं. कुठलाही व्यक्ती जाणूनबुजून कायदेशीर कारवाई टाळून कोर्टाकडून दिलाशाची अपेक्षा करु शकत नाही, असं न्यायालायने स्पष्ट केलं. माल्याने स्वत:ला फरार घोषित करण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. त्यावर सुनावणी करताना मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे म्हटलं. कोर्टाने माल्याला आपली भूमिका स्पष्ट करण्याची शेवटची संधी देत भारतात परतणार का? असं विचारलं. कोर्टाच्या मते माल्या जाणीवपूर्वक स्वत:ला कोर्ट कारवाईपासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून त्याला दिलासा मिळू शकत नाही.