तुम्हाला माहितीये का? पाकिस्तानात कित्येक वर्षांपासून उभी आहे भारताची ट्रेन, नेमकं कारण काय?

Indian Train in Pakistan : पाकिस्तानातील एका रेल्वे स्थानकावर भारताची एक ट्रेन अनेक वर्षांपासून उभी आहे. यामागे काय कारण आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तुम्हाला माहितीये का? पाकिस्तानात कित्येक वर्षांपासून उभी आहे भारताची ट्रेन, नेमकं कारण काय?
Indian Train in Pakistan
Image Credit source: Google
| Updated on: Jun 29, 2026 | 9:31 PM

भारतातील रेल्वे नेटवर्क हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. दररोज लाखो लोक या रेल्वेने प्रवास करत असतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, पाकिस्तानातील एका रेल्वे स्थानकावर भारताची एक ट्रेन अनेक वर्षांपासून उभी आहे. ही ट्रेन फाळणीपूर्वीची नसून काही वर्षांपूर्वीपर्यंत भारत आणि पाकिस्तानदरम्यान नियमित धावणारी समझौता एक्सप्रेस (क्रमांक 14607) आहे. ही भारतीय ट्रेन पाकिस्तानातच का अडकून पडली आहे ते जाणून घेऊयात.

लाहोर-अटारी ट्रेनसेवा बंद

समोर आलेल्या माहितीनुसार, 2019 पूर्वी भारत आणि पाकिस्तानदरम्यान समझौता एक्सप्रेस ही रेल्वे सेवा सुरू होती. ही ट्रेन भारतातील अटारी आणि पाकिस्तानातील लाहोर दरम्यान धावत होती. मात्र, 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने लाहोर-अटारी मार्गावरील या ट्रेनची सेवा कायमस्वरूपी बंद करण्याची घोषणा केली. भारताच्या या निर्णयाविरोधात पाकने ही कारवाई केली होती.

पाकिस्तानचे चालक आणि गार्ड समझौता एक्सप्रेसला वाघा सीमेपासून भारतातील अटारी स्टेशनपर्यंत आणत असत. वाघा आणि अटारीदरम्यान अवघे तीन किलोमीटर अंतर ही ट्रेन पार करत असे. आठवड्यातून दोन दिवस ही सेवा सुरू होती. मात्र, पाकिस्तानच्या अचानक घेतलेल्या निर्णयानंतर ट्रेनला वाघा स्टेशनजवळच थांबवण्यात आले. पाकिस्तानचे चालक आणि गार्ड ट्रेन अटारीपर्यंत घेऊन जाण्यास तयार झाले नाहीत.

वाघा स्टेशनवर उभी आहे भारतीय ट्रेन

सध्या पाकिस्तानातील वाघा स्टेशनजवळ समझौता एक्सप्रेसचे 11 डबे उभे आहेत. पाकिस्तानहून येणाऱ्या या ट्रेनचे डबे भारताचे होते, तर इंजिन पाकिस्तानचे असायचे. पाकिस्तानने ट्रेन वाघा स्टेशनवर थांबवल्यानंतर चालक आणि गार्ड इंजिन घेऊन निघून गेले. त्यानंतर भारताचे 11 डबे तिथेच उभे राहिले आणि आजपर्यंत ते तिथेच आहेत.

समझौता एक्सप्रेसचा इतिहास

भारत-पाकिस्तान फाळणीपूर्वी अटारी ते लाहोर दरम्यान रेल्वे सेवा सुरू होती. मात्र, स्वातंत्र्यानंतर ही सेवा बंद झाली. त्यानंतर 22 जुलै 1976 रोजी शिमला करारानंतर लाहोर ते अमृतसरदरम्यान पुन्हा समझौता एक्सप्रेस सुरू करण्यात आली. 1994 पासून या सेवेचा मार्ग बदलून लाहोर ते अटारी असा करण्यात आला. दोन्ही देशांमधील तणाव वाढला की या रेल्वे सेवेवर अनेक वेळा बंदी घालण्यात आली होती. मात्र, 2019 मध्ये सेवा बंद झाल्यानंतर ती पुन्हा सुरू झालेली नाही. आता आगामी काळात ही रेल्वेसेवा सुरु होते की नाही ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Follow Us