हटके लग्नसोहळा… इथे चिखलात लोळून पाहुण्यांचे केले जाते स्वागत, वर-वधूला काढावा लागतो प्राण्याचा आवाज
आरे बापरे! ना गुलाब, ना इत्र, परंपरेचा वेगळा अंदाज. या राज्यात चिखलात लोळून लग्नाला आलेल्या पाहुण्याचे केले जाते स्वागत. तर वर-वधूला काढावा लागतो प्राण्याचा आवाज.

छत्तीसगड राज्य आपल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आदिवासी परंपरांसाठी ओळखले जाते. या परंपरांमध्ये अनेक रुढी अशा आहेत ज्या आधुनिक समाजाला आश्चर्यचकित करतात पण त्यामागे खोल सांस्कृतिक अर्थ दडलेला असतो. अशाच एका अनोख्या परंपरेमुळे मैनपाट परिसरातील मांझी-मझवार समाज पुन्हा चर्चेत आला आहे.
मांझी जनजातीत विवाह सोहळा हा केवळ दोन कुटुंबांचा मिलाफ नसून तो निसर्गाशी असलेले नाते व्यक्त करणारा सोहळा मानला जातो. येथे बारात्यांचे स्वागत फुलांनी किंवा पारंपरिक पद्धतीने न करता, चिखलात लोळून केले जाते. विशेष म्हणजे, मुलीचे भाऊ सजून-धजून स्वागत करण्याऐवजी चिखलात पूर्णपणे माखून नाचत-गात बारात्यांचे स्वागत करतात. यानंतर तेच भाऊ त्या अवस्थेत वराकडे जाऊन त्याला हळद आणि तेल लावतात आणि मंडपात येण्यासाठी निमंत्रण देतात. ही परंपरा पाहणाऱ्यांसाठी नक्कीच वेगळी आणि लक्षवेधी ठरते.
परंपरेसाठी खास तयारी
ही अनोखी प्रथा पार पाडण्यासाठी मुलीच्या घरच्यांकडून विशेष तयारी केली जाते. बारात येण्याच्या मार्गावर ट्रॉलीने माती आणून टाकली जाते आणि त्यावर पाणी टाकून चिखल तयार केला जातो. याच चिखलात मुलीचे भाऊ आणि इतर नातेवाईक लोळून आपली परंपरा पूर्ण करतात.
या समाजाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे त्यांचे गोत्र. मांझी समाजात गोत्र हे प्राणी किंवा पक्ष्यांच्या नावावर आधारित असतात. जसे म्हैस, मासा किंवा नाग. परंपरेनुसार, लग्नावेळी मुलीच्या कुटुंबातील सदस्य आपल्या गोत्राशी संबंधित प्राण्याचे रूप धारण करतात. उदाहरणार्थ, म्हैस गोत्र असलेले भाऊ म्हशीसारखी शेपटी लावून चिखलात लोळत बारात्यांचे स्वागत करतात.
वर-वधूही परंपरेचा भाग
या अनोख्या विधीत केवळ कुटुंबीयच नाही तर वर आणि वधूही सहभागी होतात. त्यांच्याकडून त्यांच्या गोत्राशी संबंधित प्राण्यांचे आवाज काढून घेतले जातात. जरी ही प्रथा ऐकायला विचित्र वाटत असली तरी तिचा इतिहास खूप जुना असल्याचे मानले जाते.
मांझी समाजातील ज्येष्ठांच्या मते, ही परंपरा आजची नसून महाभारताच्या काळापासून चालत आली आहे. समाजातील लोक याला आपली सांस्कृतिक ओळख मानतात आणि ती जपण्यासाठी कटिबद्ध आहेत.
विशेष म्हणजे, ही परंपरा केवळ ज्येष्ठांपुरती मर्यादित नसून नव्या पिढीतील तरुणही ती तितक्याच उत्साहाने पुढे नेत आहेत. ते या रुढींमध्ये सक्रिय सहभाग घेतात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सांस्कृतिक वारशाची माहिती जगभर पोहोचवत आहेत.