पैसे कट झाले पण पेमेंट फेल? घाबरू नका, ‘या’ सोप्या पद्धतीने बँक खात्यात परत मिळेल रिफंड

डिजिटल व्यवहारांमध्ये अनेकदा UPI पेमेंट करताना स्क्रीनवर 'पेमेंट फेल' असा मेसेज येतो, मात्र बँक खात्यातून पैसे कट होतात. अशा वेळी युजर्स घाबरून त्वरित दुसरा व्यवहार करतात. परंतु, संयम बाळगणे आवश्यक आहे; कारण तांत्रिक अडचणींमुळे अडकलेली ही रक्कम बहुतांश वेळा एका तासाच्या आत खात्यात आपोआप जमा केली जाते.

पैसे कट झाले पण पेमेंट फेल? घाबरू नका, या सोप्या पद्धतीने बँक खात्यात परत मिळेल रिफंड
UPI payment
| Updated on: Aug 18, 2026 | 5:39 PM

एस, कुलकर्णी:  यूपीआई पेमेंट अपयशी ठरूनही खात्यातून रक्कम वजा झाल्यास पुन्हा पुन्हा पेमेंट करणे टाळावे. सर्वप्रथम तुमच्या बँक अ‍ॅप किंवा यूपीआई अ‍ॅपमध्ये जाऊन त्या व्यवहाराची अचूक स्थिती (Status) तपासावी. बहुतांश प्रकरणांमध्ये बँक आणि NPCI च्या यंत्रणेद्वारे हा रिफंड ठराविक वेळेत ग्राहकाच्या खात्यात सुरक्षितपणे वर्ग केला जातो. डिजिटल व्यवहारांच्या युगात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. मात्र, अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे UPI पेमेंट अयशस्वी (Failed) होते आणि बँक खात्यातून पैसे मात्र वजा होतात. अशा वेळी घाबरून न जाता, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या अधिकृत मार्गदर्शक तत्त्वांनुसार ग्राहकांना त्यांचे पैसे सुरक्षितपणे परत मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे.

आधी 60 मिनिटे वाट पाहा
NPCI च्या नियमांनुसार, जेव्हा एखादा UPI व्यवहार अयशस्वी होतो परंतु खात्यातून पैसे कापले जातात, तेव्हा बहुतांश वेळा सिस्टीमद्वारे ते पैसे आपोआप परत (Auto-Refund) केले जातात. तांत्रिक बिघाड किंवा बँक सर्व्हरवरील अतिभारामुळे असे झाल्यास, ग्राहकांनी त्वरित दुसरा व्यवहार न करता कमीत कमी 60 मिनिटे (1 तास) वाट पाहणे आवश्यक आहे. साधारणतः या पहिल्या एका तासातच बहुतांश व्यवहारांचे पैसे खात्यात पुन्हा जमा होतात.

RBI चे अधिकृत रिफंड टाईमलाईन नियम
जर 1 तासात पैसे परत आले नाहीत, तर RBI च्या टर्नअराउंड टाईम (TAT) नियमांनुसार बँकांसाठी खालील कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

P2P – Person to Person ट्रान्सफर: जर तुम्ही मित्राला किंवा नातेवाईकाला पैसे पाठवत असाल आणि व्यवहार अपयशी ठरला, तर T+1 कामकाजाच्या दिवसात (T म्हणजे व्यवहाराचा दिवस + 1 दिवस) पैसे खात्यात परत येणे बंधनकारक आहे.
P2M – Person to Merchant पेमेंट: दुकानात किंवा ऑनलाइन खरेदी करताना व्यवहार अयशस्वी झाल्यास, रिफंडसाठी T+5 कामकाजाच्या दिवसांची मुदत दिली जाते.

बँकेला भरावा लागणार दररोज 100 रुपये दंड
ग्राहकांच्या संरक्षणासाठी रिझर्व्ह बँकेने एक कडक नियम लागू केला आहे. जर बँकेने ठरवून दिलेल्या मुदतीत (T+1 किंवा T+5 दिवसांत) ग्राहकाचे पैसे परत केले नाहीत, तर मुदतीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी बँकेला ग्राहकाला 100 प्रति दिवस या दराने भरपाई (Compensation) द्यावी लागते. ही भरपाई ग्राहकाच्या खात्यात आपोआप जमा होणे आवश्यक आहे.

तक्रार कशी नोंदवावी?
UDIR चा वापर करा: प्रत्येक UPI ॲपमध्ये (उदा. PhonePe, Google Pay, Paytm) Unified Dispute and Issue Resolution (UDIR) ही इन-बिल्ट प्रणाली असते. ॲपच्या ‘ट्रांजॅक्शन हिस्ट्री’मध्ये जाऊन संबंधित व्यवहारावर क्लिक करून ‘Raise Dispute’ किंवा ‘Check Status’ पर्याय निवडा.

बँकेच्या UPI हेल्पलाईनशी संपर्क साधा: ॲपवरून तोडगा न निघाल्यास, आपल्या बँकेच्या अधिकृत डिजिटल पेमेंट विभागाशी संपर्क साधा आणि 12 अंकी UTR (Unique Transaction Reference) क्रमांक नोंदवून तक्रार करा.
RBI ऑम्बड्समन (लोकपाल) कडे तक्रार: बँक किंवा ॲप पुरवठादाराने 30 दिवसांच्या आत तक्रारीचे निवारण केले नाही, तर ग्राहक थेट RBI च्या अधिकृत तक्रार व्यवस्थापन प्रणाली (CMS पोर्टलमार्फत) ऑनलाइन तक्रार दाखल करू शकतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us