‘…तर बच्चू कडूंनी सरकारमधून बाहेर पडावं’, अब्दुल सत्तारांचं आव्हान

शिवसेनेचे नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बच्चू कडूंना सरकारमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे (Abdul Sattar slams Bachchu Kadu).

...तर बच्चू कडूंनी सरकारमधून बाहेर पडावं, अब्दुल सत्तारांचं आव्हान
Chetan Patil | Updated on: Feb 08, 2020 | 9:46 PM

औरंगाबाद : सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्य सरकारची दोन लाखांची शेतकरी कर्जमाफी ही बुजगावणी आहे, अशी टीका केली होती. या टीकेवरुन शिवसेनेचे नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बच्चू कडूंना सरकारमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे (Abdul Sattar slams Bachchu Kadu).

“बच्चू कडूंना शेतकरी कर्जमाफी बुजगावणी वाटत असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावं. कर्जमाफीतून मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना दोन लाखांचा फायदा होणार आहे. ही अंतिम कर्जमाफी नाही. हा पहिला टप्पा आहे. शासनाच्या तिजोरीत जसजसे पैसे येतील त्यानुसार कर्जमाफी केली जाईल. पुढच्या टप्प्यात दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही निर्णय घेतला जाईल”, असे अब्दुल सत्तार म्हणाले (Abdul Sattar slams Bachchu Kadu).

“मागच्या सरकारने दीड लाखाचा कर्जमाफीच्या निर्णयात किती अटी शर्ती ठेवल्या होत्या? ती कर्जमाफी बच्चू कडूंना चांगली वाटत होती का? आमच्या सरकारने कोणत्याही अटी न ठेवता सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला. ही कर्जमाफी वेगळी वाटत असेल तर बच्चू कडू्ंना याबाबत विचारलं पाहिजे”, असा टोला सत्तार यांनी लगावला.

दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या टीकेला बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलं. “अब्दूल सत्तार यांना सरकारमधून बाहेर पडा, असं सांगण्याचा अधिकार नाही. त्यांनी आपले अधिकार तपासूण पाहावे”, असा पलटवार बच्चू कडू यांनी केला.

“एक राज्यमंत्री आणि आमदार म्हणून स्थानिक पातळीची वस्तुस्थिती सरकारपर्यंत घेऊन जायची ही माझी जबाबदारी आहे. यामध्ये आम्ही काही सरकारवर दोषारोप केले नाहीत. प्रशासनाकडून काही चुका होत आहेत त्या चुका सरकारने दुरुस्त कराव्यात”, असं बच्चू कडूंनी स्पष्ट केलं.

Follow Us