बूम सॅनिटाईज, घाईघाईत कोव्हिड सेंटरचं उद्घाटन, पांडुरंगबाबतच्या प्रश्नावर अजित पवार गप्प

| Updated on: Sep 02, 2020 | 12:52 PM

कोरोना संसर्ग झाल्यानंतर अ‍ॅम्ब्युलन्स आणि बेड वेळेत उपलब्ध न झाल्याने 'टीव्ही 9 मराठी'चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांना प्राण गमवावे लागले.

बूम सॅनिटाईज, घाईघाईत कोव्हिड सेंटरचं उद्घाटन, पांडुरंगबाबतच्या प्रश्नावर अजित पवार गप्प
Follow us on

पुणे : ‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच झाला, असे सांगत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी चौकशीचे आदेश दिले खरे, मात्र “दादा, पांडुरंगच्या मृत्यूवर बोला, अ‍ॅम्ब्युलन्स मिळाली नाही, प्रतिक्रिया द्या” अशा प्रश्नांची सरबत्ती पत्रकारांकडून होत असतानाही अजित पवार उत्तर न देताच रवाना झाल्याने चीड व्यक्त केली जात आहे. कोरोना संसर्ग झाल्यानंतर अ‍ॅम्ब्युलन्स आणि बेड वेळेत उपलब्ध न झाल्याने रायकरांना प्राण गमवावे लागले. (Ajit Pawar keeps mum on TV9 Marathi Pune Reporter Pandurang Raykar Death)

अजित पवार दर 15 दिवसांनी पुण्यात येतात. विभागीय आयुक्त कार्यालयात बैठका घेतात, पण पत्रकारांना उत्तर देत नसल्याचे चित्र आहे. जम्बो रुग्णालयाबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा दादांनी बूम सॅनिटाईज केला होता. दुसरीकडे, पांडुरंग रायकर यांच्या पत्नीची टेस्ट दुपार 12 वाजेपर्यंत बाकी होती. अँटिजन टेस्ट कीट मिळालेले नाही, मृतदेह ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.

पुण्यात केवळ 350 महापालिका डॉक्टर आहेत, मात्र दीड लाखाच्या पुढे रुग्णसंख्या गेली आहे. जम्बो कोव्हिड हॉस्पिटल आहे, पण आवश्यक निमवैद्यकीय स्टाफ उपलब्ध नाही. रुग्णालयाच्या बाहेर बाऊन्सर उभे केले आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांना बेडसाठी धावाधाव करावी लागते. बेड असल्याची माहिती मिळाल्यावर रुग्णालयात पोहोचल्यावर बाऊन्सर हाकलून देतात, आपल्यापर्यंत माहिती नसल्याचे सांगतात. रुग्णालयात गेलेला रुग्ण नेमका कुठे आहे, त्याची स्थिती काय, हे बाहेर कळत नाही. हा विषय फक्त पांडुरंग रायकर यांच्यापुरता मर्यादित नाही, तर प्रत्येक पुणेकराचा आहे.

नेमकं काय घडलं?

  • पांडुरंग रायकर यांना 20 ऑगस्टला थंडी आणि तापाचा त्रास, त्यानंतर डॉक्टरांकडे जाऊन उपचार.
  • पांडुरंग रायकर यांची 27 ऑगस्टला कोरोना चाचणी, मात्र अहवाल निगेटिव्ह
  • दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 ऑगस्टला पांडुरंग रायकर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या गावी गेले.
  • गावी गेल्यावरही त्रास झाल्यामुळे कोपरगावमधे अँटीजेन टेस्ट, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह
  • रविवार 30 ऑगस्टला रात्री त्यांना अँब्युलन्समधून उपचारांसाठी पुण्यात आणलं, पुण्यातील पत्रकारांनी त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीने रायकर यांना जंबो हॉस्पिटलमधे भरती केलं.
  • जम्बो हॉस्पिटलमधे त्यांच्यावर आयसीयूमधे उपचार सुरु होते, मात्र त्यांची परिस्थिती खालावत होती
  • रायकर यांना खाजगी हॉस्पिटलमधे दाखल करण्याचे प्रयत्न पुण्यातील पत्रकारांनी सुरु केले
  • काल (मंगळवार 1 सप्टेंबर) त्यांची ऑक्सिजन पातळी 78 पर्यंत खाली गेली.
  • जम्बो हॉस्पिटलमधून अन्यत्र नेण्यासाठी कार्डिॲक अँब्युलन्सची गरज होती. रुग्णवाहिका मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मंगळवारी रात्री एक अँब्युलन्स जम्बो हॉस्पिटलला पोहचली, पण त्यामधील व्हेंटीलेटर खराब झाल्याचं सांगितलं गेलं.
  • दुसरी अँब्युलन्स मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते, पण त्यात डॉक्टर उपलब्ध नव्हते. तोपर्यंत रात्रीचे बारा-सव्वाबारा वाजले होते.
  • पहाटे चार वाजता अँब्युलन्स मिळवण्याचा प्रयत्न पुन्हा सुरु झाला पण तोपर्यंत पांडुरंगची प्रकृती आणखी खालावली होती.
  • दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून पहाटे पाच वाजता अँब्युलन्स उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आणि आयसीयूमधील डॉक्टरांचा ‘आम्ही निघत आहोत’ असा फोन आला.
  • पांडुरंगचे मित्र असलेले पत्रकार आणि नातेवाईक जम्बो हॉस्पिटलला पोहचले आणि डॉक्टरांनी साडेपाच वाजता त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं.
  • कार्डिॲक अँब्युलन्स जम्बो हॉस्पिटलला पोहचली पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

पांडुरंग रायकर यांची कारकीर्द

पुण्यासारख्या शहरात आपल्या शांत आणि संयमी पत्रकारितेने पांडुरंग रायकर यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली होती. लॉकडाऊन ते अनलॉकिंग आणि मिशन बिगिन अगेनपर्यंत सर्व महत्त्वाच्या घडामोडी पांडुरंग यांनी ‘टीव्ही 9’ च्या माध्यमातून मराठी माणसापर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या निधनाने टीव्ही 9 परिवाराला धक्का बसला आहे. मूळचे नगर जिल्ह्यातील असलेले पांडुरंग रायकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

ई टीव्ही मराठी, एबीपी माझा ते टीव्ही 9 मराठी असा पांडुरंग यांचा पत्रकारितेतील 15 वर्षांचा प्रवास. शेती ते सिनेमा, क्रीडा ते राजकारण अशा विविध विषयांवर पांडुरंग यांनी वार्तांकन केलं. गेल्या तीन वर्षापासून ते टीव्ही 9 मराठीसोबत होते.

पांडुरंग यांच्या निधनाने पुणे पत्रकारिता क्षेत्रासह राजकीय, सामजिक क्षेत्र आणि विविध मान्यवरांकडून शोक व्यक्त होत आहे. कोरोनाच्या संकटातही अविरतपणे काम करुन बातम्या देणाऱ्या पांडुरंग यांचीच बातमी होते, हा विचारच काळीज पिळवटून जातो. या कठीण काळात पांडुरंग यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी टीव्ही 9 मराठी परिवार खंबीरपणे उभा आहे.

संबंधित बातम्या :

पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच, अजित पवारांकडून चौकशीचे आदेश

संयत रिपोर्टर, शांत स्वभाव, ‘टीव्ही 9’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनाने निधन

अ‍ॅम्ब्युलन्स नाही, बेड नाही, पांडुरंगचा अखेरपर्यंत संघर्ष, आरोग्य यंत्रणेच्या चिंधड्या उडवणारा घटनाक्रम

(Ajit Pawar keeps mum on TV9 Marathi Pune Reporter Pandurang Raykar Death)