Onion Price: कांदा पुन्हा रडवणार? सर्वसामान्यांचं किचन बजेट कोलमडणार, मोठी अपडेट काय?
Onion Rate Hikes: गेल्या आठवड्यात कांद्याचा घाऊक भाव लक्षणीयरित्या वधारला. सरकार वाढत्या किंमती नियंत्रीत करण्यासाठी कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणण्याची तयारी करत आहे. दक्षिणेतील राज्यात पिकांचे उत्पादन उशीर येण्याची शक्यता आहे. परिणामी किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

देशातील मोठ्या बाजारपेठेत नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजारपेठेत गेल्या आठवड्यात घाऊक कांद्याचा भाव 25 टक्क्यांनी वधारला. तर किंमती नियंत्रित करण्यासाठी सरकार बफर स्टॉक बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, दक्षिण भारतातील खरीपातील कांदा बाजारात येण्यासाठी वेळ लागणार आहे. यामुळे किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बफर स्टॉक बाजारात आणण्याची योजना राबवू शकते. यावर्षी, सरकारने या हंगामासाठी किमान हमी खरेदी दर सात वेळा वाढवला. कांदा खरेदीचा अंदाजित आकडा 2 लाख टनांच्या उद्दिष्टांपेक्षा जवळपास 25 टक्क्यांनी कमी आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे.
कांद्याच्या घाऊक किंमतीत 25 टक्क्यांची वाढ
बुधवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने कांद्याची सरासरी किंमत 27 रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत पोहचवली. हा भाव या 5 ऑगस्ट रोजी 21.50 रुपये प्रति किलो इतकी होती. किंमतीत जवळपास 25 टक्क्यांची वाढ झाली. या दरम्यान चांगल्या प्रतिचा कांद्याची किंमत 24 रुपये प्रति किलोहून वाढून 30 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी वाढवण्यात आली. रब्बी हंगामातील कांदा, मार्च आणि एप्रिल महिन्यात साठवला जातो. ऑक्टोबरपर्यंत देशाला हा कांदा पुरतो. कर्नाटक, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशातील छोट्या खरीप पिकांची मदत मिळते. त्यानंतर ऑक्टोबरपासून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सारख्या प्रमुख राज्यातील मुख्य खरीप पीक हाती येते.
सप्टेंबर निश्चित करणार कांद्याची किंमत
महाराष्ट्रातील कांदा विक्रेते दानिश शाह यांनी ईटीला दिलेल्या माहितीनुसार, येत्या हप्त्यात कांद्याच्या किंमती स्थिर असतील. पण सप्टेंबर महिन्यात कांद्याचा भाव वाढेल की स्थिर राहिल हे स्पष्ट होईल. जर मुसळधार पावसामुळे दक्षिणेतील राज्यातील नवीन पिकांचे नुकसान होत असेल तर यामुळे किंमती वाढीसाठी दबाव येऊ शकतो. जर चांगल्या प्रतिचा कांदा बाजारात आला तर किंमती नियंत्रित असतील असा दावा त्यांनी केला.
कांद्याची आवक का थांबली?
महाराष्ट्रात मान्सून रेंगाळला. यामुळे खरीप हंगामाला उशीरा सुरुवात झाली. नाशिकमध्ये खरिपाचे पीक हाती येण्यास उशीर झाला. सध्या कांद्याच्या किंमती स्थिर आहेत. पण दक्षिणेतील राज्यातील कांद्याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. जर नवीन कांदा बाजारात आला नाही तर मात्र किंमती वाढू शकतात. रब्बी हंगामात कांद्याच्या साठवणीचा प्रश्न नाही. पण एकूणच यंदा कांद्याची गुणवत्ता घसरलेली असेल. चांगल्या प्रतिचा कांदा बाजारात अधिक प्रमाणात उपलब्ध नसेल. परिणामी किंमती भडकण्याची शक्यता आहे.
