कल्याण : घरगुती वादातून पतीने पत्नीची हत्या केली. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरातील वाडी गावात ही घटना घडली. राज पाटील असं आरोपी पतीचं नाव आहे. त्याने पत्नी वैशालीचा धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली. वैशाली ही कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिवसेना नगरसेविका विमल भोईर यांची मुलगी होती.
मलंगगड परिसरातील वाडी गावात राहणाऱ्या राज पाटील याचं दहा वर्षांपूर्वी उल्हासनगरच्या माणेरे गावात राहणाऱ्या वैशाली भोईरसोबत लग्न झालं होतं. मात्र पत्नी आवडत नसल्याने राज याचे पत्नीसोबत वाद होत होते. त्यातूनच काल संध्याकाळी राज याने धारदार शस्त्राने वैशालीची हत्या केली आणि त्यानंतर स्वतः पोलिसांना याची माहिती दिली.
यानंतर हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केला. दुसरीकडे राज पाटील याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे मलंगगड परिसरात तणावाचं वातावरण आहे.