‘तरुणांचं बेरोजगारीवरुन लक्ष हटवण्यासाठी भाजपचं नाटक’, लव जिहादच्या मुद्द्यावर असदुद्दीन ओवेसी यांचं प्रत्युत्तर

| Updated on: Nov 22, 2020 | 6:56 PM

भाजपनं लव जिहाद विरोधात कायदा करण्याआधी संविधानाचा अभ्यास करावा. केवळ तरुणांचं बेरोजगारीवरुन लक्ष हटवण्यासाठी भाजप लव जिहादचं नाटक करत आहे, असं मत असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केलं.

तरुणांचं बेरोजगारीवरुन लक्ष हटवण्यासाठी भाजपचं नाटक, लव जिहादच्या मुद्द्यावर असदुद्दीन ओवेसी यांचं प्रत्युत्तर
Follow us on

पाटणा : भाजपचे नेते गिरिराज सिंह यांनी लव जिहाद हा देशातील अनेक राज्यांमध्ये डोकेदुखीचा विषय झाल्याचा दावा केला. तसेच बिहारमध्ये लव जिहादविरोधात कायदा करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला. यावर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रत्युत्तर दिलंय. भाजपनं लव जिहाद विरोधात कायदा करण्याआधी संविधानाचा अभ्यास करावा. केवळ तरुणांचं बेरोजगारीवरुन लक्ष हटवण्यासाठी भाजप लव जिहादचं नाटक करत आहे, असं मत असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केलं (Asaduddin Owaisi says BJP is misleading nation with Love Jihad issue).

“लव जिहाद कायदा करण्याआधी विशेष विवाह कायदा रद्द करावा लागेल”

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “आंतरधर्मीय लग्नांविरोधात कायदा करणं हे भारतीय संविधानाच्या कलम 14 आणि 21 चं खुलेआम उल्लंघन आहे. जर असा कायदाच करायचा असेल तर मग विशेष विवाह नोंदणी कायदा रद्द करा. भाजपने आधी संविधानाचा अभ्यास करण्याची गरज आहे. भाजपला या द्वेषाच्या राजकारणाचा अजिबात उपयोग होणार नाही. देशातील तरुणांचं बेरोजगारीसारख्या मुद्द्यांवरुन लक्ष हटवण्यासाठी भाजप हे नाटक करत आहे.”

‘भाजप बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देऊ शकत नाही’

ओवेसी यांनी बेरोजगार तरुण आणि नोकऱ्यांच्या मुद्द्यावर भाजपला चांगलंच घेरलं. ते म्हणाले, “कोरोनाच्या साथीरोगामुळे भारतात कोट्यावधी तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. भाजप त्यांना त्यांच्या नोकऱ्या देऊ शकत नाही. जीडीपी शून्य आहे आणि त्यासाठी भाजप काहीही करु शकत नाही. देशातील तरुण बेरोजगारीचा बळी ठरत आहेत आणि गरीबी हेच त्यांचं नशिब बनलं आहे. त्यामुळे या तरुणांचं लक्ष बेरोजगारीवरुन हटवण्यासाठी भाजप हे लव जिहादचं नाटक करत आहे.”

‘लव जिहादचा धार्मिकतेशी काहीही संबंध नाही’

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी नुकतीच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे लव जिहादविरोधात कायदा करण्याची मागणी केली. तसेच लव जिहाद आणि लोकसंख्या नियंत्रणसारख्या मुद्द्यांचा धार्मिकतेशी संबंध नसल्याचा दावा केला. ते म्हणाले, “हा विषय सामाजिक समरसतेचा आहे. लव जिहादचा विषय देशातील केवळ हिंदूंचा नाही, तर इतर सर्व मुस्लीमेत्तर नागरिकांचा म्हणून पाहिलं पाहिजे.”

संबंधित बातम्या :

कोणत्याही धर्माला कमी लेखणं चुकीचं; वैदिक परंपरा मान्य करा, प्रकाश आंबेडकरांचा ओवेसींना सल्ला

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट, ओवेसींचा ममतादीदींना युतीचा प्रस्ताव

Bihar election result 2020: सीमांचलमध्ये असदुद्दीन ओवेसींच्या MIM चे 5 उमेदवार विजयी, बिहारमध्ये ओवेसींचं महत्व वाढलं

Asaduddin Owaisi says BJP is misleading nation with Love Jihad issue