सरकारचा मोठा निर्णय, औरंगाबाद विमानतळाचं नाव बदललं

| Updated on: Mar 05, 2020 | 8:34 PM

औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्यात आले (Aurangabad Airport Name Change) आहे.

सरकारचा मोठा निर्णय, औरंगाबाद विमानतळाचं नाव बदललं
Follow us on

औरंगाबाद : औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्यात आले (Aurangabad Airport Name Change) आहे. आज (5 मार्च) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतची घोषणा विधानसभेत केली.

विमानतळाचे नामांतर करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून (Aurangabad Airport Name Change) सातत्याने मागणी होत आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिकेने देखील “ धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ” असे नाव करण्याबाबत ठराव संमत केला आहे. तसेच लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने आज या प्रस्तावास मान्यता दिली. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे तो पाठविण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

यापूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई असे करण्यात आले होते. तर कोल्हापूर विमानतळाचे नाव छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर असे करण्यात आले आहे. याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजीराजे विमानतळ केल्यामुळे औरंगाबाद शहराचे महापौर आणि उपमहापौर यांनी शिवसेनेचा खासदार चंद्रकांत खैरे यांचा सत्कार केला आहे. चंद्रकांत खैरेंचा विमानतळावरच सत्कार करण्यात आला.

औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालंच पाहिजे : चंद्रकांत पाटील

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराला संभाजीनगर असे नाव द्या अशी मागणी राजकीय पक्षांकडून करण्यात येत होती. त्यापूर्वी औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

शिवसेना, मनसेसह भाजपकडून ‘औरंगाबाद’ शहराचे ‘संभाजीनगर’ असं नामांतर करण्याचा आग्रह धरला आहे.

… तर मी स्वतः औरंगाबादला संभाजीनगर नाव द्यायला पुढाकार घेईन : इम्तियाज जलील

“औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल असून, त्याला गती देऊन शहराचे नाव बदललेच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. औरंगजेब हा एक आक्रमणकारी होता. त्यामुळे या शहराचे नामांतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे करावे.” अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली (Aurangabad Airport Name Change) होती.