नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच, सरकारकडून मदतीच्या आश्वासनाची पूर्तता अद्याप नाही!

| Updated on: Nov 15, 2020 | 10:38 AM

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदतीची रक्कम जमा केली जाईल, असं आश्वासन सत्ताधारी पक्षातील अनेक मंत्री आणि नेत्यांनी दिलं. त्यामुळे मुलाबाळांची दिवाळी गोड करता येईल अशी आशा या शेतकऱ्यांना होती. पण राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीचा आभाव, बँकांच्या सुट्ट्या आणि प्रशासकीय दिरंगाईमुळं शेतकरी मदतीपासून वंचित आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच, सरकारकडून मदतीच्या आश्वासनाची पूर्तता अद्याप नाही!
Follow us on

औरंगाबाद: परतीच्या पावसानं दिलेल्या तडाख्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांची शेती आणि पिकांचं प्रचंड नुकसान झालं. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचं आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आलं होतं. पण अद्याप सरकारकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. त्यामुळे यंदाची दिवाळी अंधारातच घालवण्याची वेळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर आली आहे. (The State government has not kept its promise to help farmers before Diwali)

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, उस, भूईमुगाचं प्रचंड मोठं नुकसान झालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक नेतेमंडळींनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात या नेत्यांनी दौरा केला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. पण अजूनही ही मदत शेतकऱ्यांच्या पदरात पडलेली नाही.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदतीची रक्कम जमा केली जाईल, असं आश्वासन सत्ताधारी पक्षातील अनेक मंत्री आणि नेत्यांनी दिलं. त्यामुळे मुलाबाळांची दिवाळी गोड करता येईल अशी आशा या शेतकऱ्यांना होती. पण राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीचा आभाव, बँकांच्या सुट्ट्या आणि प्रशासकीय दिरंगाईमुळं शेतकरी मदतीपासून वंचित आहे.

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रवक्त नबाव मलिक यांच्यासह सत्ताधारी महाविकास आघाडीतील अनेक नेते आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल असं सांगितलं होतं. पण नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन पार पडलं तरीही शेतकऱ्यांना पदरी निराशाच आहे. त्यामुळे सरकारनं जाहीर केलेली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठीची मदत आता कधी मिळणार हे पाहावं लागणार आहे.

आचारसंहिता काळात मदत देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० हजार कोटी रुपयाच्या पॅकेजची घोषणा केली होती. पण अद्याप हा निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या मदतीला उशीर लागण्याची शक्यता होती. पण अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता काळातही शेतकऱ्यांना मदत देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

संबंधित बातम्या:

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच आर्थिक मदत मिळेल, बच्चू कडूंचं आश्वासन

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राचे पथक अजूनही आलेच नाही, आता विरोधक गप्प का?: विजय वडेट्टीवार

राज्य सरकार आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आचारसंहिता काळात मदत देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी

The State government has not kept its promise to help farmers before Diwali