दोन लाखांची कर्जमाफी ही बुजगावणी आहे : बच्चू कडू

| Updated on: Feb 05, 2020 | 11:09 PM

"दोन लाखांची कर्जमाफी ही बुजगावणी आहे", असं विधान महाविकास आघाडी सरकारचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलं.

दोन लाखांची कर्जमाफी ही बुजगावणी आहे : बच्चू कडू
Follow us on

पुणे : “दोन लाखांची कर्जमाफी ही बुजगावणी आहे”, असं विधान महाविकास आघाडी सरकारचे जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलं. “आतापर्यंत आम्हाला किती लुटलं गेलं याचा हिशोब केला तर सरकारकडेच आमचे पैसे निघतील”, असं बच्चू कडू म्हणाले (Bachchu Kadu on Farmer’s loan Waiver). पुण्याच्या आळंदी येथे आज (5 फेब्रुवारी) वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली (Bachchu Kadu on Farmer’s loan Waiver). यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

“तूरडाळीला हमीभाव देणं आणि ते जाहीर करणं हे केंद्र सरकारच्या हातात आहे. पण केंद्र ते काम करत नाही”, अशी खंत बच्चू कडूंनी व्यक्त केली. “तुरीच्या आयात-निर्यातीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांचं नुकसान झालं. हे नुकसान अगणित असून त्याचा अंकात विचारही करता येणार नाही”, असा आरोप बच्चू कडूंनी केला.

“कायद्यावर कायदे येत आहेत. पण शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा हे केंद्र सरकार आणू शकत नाही”, असं म्हणत बच्चू कडूंनी नाराजी व्यक्त केली.

“राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना हिंदुंच्या कार्यक्रमासाठी आमंत्रण देऊ नये असं पत्रक काढणाऱ्या संघटनेला गांभीर्याने घेऊ नका”, असं आवाहन बच्चू कडूंनी केलं. तर “राष्ट्रवादी आणि काँग्रेसने थकविल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुट्टीवर जावं लागलं असं वक्तव्य करणारे भाजप आमदार नितेश राणे हे विचार करण्याजोगते नाहीत”, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी अन्नत्यागाचं आंदोलन सुरु केलं. याबाबत बच्चू कडू यांना विचारले असता ठेकेदारावर कारावाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय याप्रकरणी वसतिगृहाच्या अन्नाचा विषय दोन दिवसांत निकाली काढण्याचं आदेश दिले असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली.