बांगलादेशी खेळाडूंचा उन्माद, विजयानंतर भारतीय खेळाडूंना धक्काबुक्की

| Updated on: Feb 10, 2020 | 7:36 PM

अंतिम सामना जिंकल्याच्या जोशात बांगलादेशच्या खेळाडूंचा स्वत:वरचा ताबा सुटला. आनंद साजरा करताना त्यांनी मैदानातील भारतीय खेळाडूंना शिविगाळ केली (Bangladesh players misbehave with Indian players).

बांगलादेशी खेळाडूंचा उन्माद, विजयानंतर भारतीय खेळाडूंना धक्काबुक्की
Follow us on

जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात रविवारी (9 फेब्रुवारी) 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना झाला. या सामन्यात बांगलादेशने 3 विकेट्सनी टीम इंडियाचा पराभव केला. अंतिम सामना जिंकल्याच्या जोशात बांगलादेशच्या खेळाडूंचा स्वत:वरचा ताबा सुटला. आनंद साजरा करताना त्यांनी मैदानातील भारतीय खेळाडूंना शिवीगाळ केली. त्यामुळे दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये धक्काबुक्की झाली. याप्रकरणावरुन बांगलादेशच्या खेळाडूंवर जगभरातील क्रिकेटप्रेमींकडून टीका केली जात आहे (Bangladesh players misbehave with Indian players).

सामना सुरु असताना बांगलादेशचे खेळाडू भारतीय फलंदाजांशी गैरवर्तवणूक करत होते. बांगलादेशचा गोलंदाज शोरीफुल इस्लाम हा प्रत्येक चेंडूनंतर भारतीय फलंदाजांशी हुज्जत घालत होता. तो त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत होता. सामना अंतिम टप्प्यावर असताना शोरीफुलची मग्रुरी कॅमेऱ्यातही कैद झाली. सामना जिंकल्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी मैदानावर उत्साह साजरा करत असताना भारतीय फलंदाजांना शिवीगाळ केली.

याप्रकरणी बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने दिलगीरी व्यक्त केली आहे. सामना जिंकल्यानंतर जे झालं ते दुर्देवी होतं, अशी प्रतिक्रिया त्याने दिली. “आमचे काही गोलंदाज अतिउत्साही झाले आणि त्यातून त्यांच्याकडून हा सर्व प्रकार घडला. खरंतर मी टीम इंडियाचं अभिनंदन करतो”, असं अकबर म्हणाला (Bangladesh players misbehave with Indian players).

दरम्यान, आयसीसीने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असल्याची माहिती अंडर 19 टीम इंडियाचे मॅनेजर अनिल पटेल यांनी दिली. “सामन्याच्या शेवटच्या क्षणाचे व्हिडीओ फुटेज बांगलादेशच्या खेळाडूंच्या गैरवर्तन केल्याची साक्ष आहे”, असं पटेल म्हणाले. तर टीम इंडियाचा कर्णधार प्रियम गर्गने बांगलादेशच्या खेळाडूंची वागणूक चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.