EC Decision on NCP | निवडणूक आयोगाच्या निकालनंतर धूमशान, मुंबईत रंगलं बॅनर वॉर

| Updated on: Feb 07, 2024 | 9:04 AM

निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा झटका बसला आहे. त्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोघांमध्ये बॅनर वॉर सुरू झालं आहे. संपूर्ण मुंबईत अजित पवार यांचे बॅनर झळकू लागले आहेत. वांद्रे-वरळी सीलिंक परिसरामध्ये अजित पवार यांना शुभेच्छा देणारे बॅनर लागले आहेत. तर शरव पवार गटाकडूनही फलकबाजी करण्यात येत आहे.

EC Decision on NCP | निवडणूक आयोगाच्या निकालनंतर धूमशान, मुंबईत रंगलं बॅनर वॉर
Follow us on

मुंबई | 7 फेब्रुवारी 2024 : मंगळवारी संध्याकाळी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय जाहीर केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा आणि चिन्ह अजितदादा गटाकडे दिल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. आमदार आणि खासदारांचे संख्याबळ तसेच बहुमताच्या जोरावर हा निर्णय अजितदादा गटाच्या बाजूने लागला. मात्र त्यामुळे ेकच खळबळ माजली. हा निकाल शरद पवार गटासाठी मोठा झटका मानला जात असून त्यांच्या गटातून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. या निर्णयानंतर शरद पवार गटाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. दिल्लीत वकिलांशी चर्चा सुरू केली. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी खलबतं सुरू झाली. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे.

मुंबईत रंगल बॅनर वॉर

दरम्यान काल संध्याकाळी झालेल्या या सर्व प्रकारानंतर आता राज्यात तसेच मुंबईत बॅनर वॉर सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ चिन्ह दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मिळाल्यानंतर आता संपूर्ण मुंबईत अजित पवार यांचे बॅनर झळकू लागले आहेत. वांद्रे-वरळी सीलिंक परिसरामध्ये अजित पवार यांना शुभेच्छा देणारे बॅनर लागले आहेत. या बॅनरवर ‘ ताकद महाराष्ट्राची प्रत्येक माणसाची, अजितदादा नेतृत्व विश्वास आणि विकास’ असा संदेश लिहिण्यात आलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा गट आणि अजित पवार गट, अशा दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या राज्यभर बॅनर वॉर रंगल्याचे चित्र संपूर्ण शहरात पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवार गटाकडूनही फलकबाजी

एकीकडे अजित पवार गटाचे कार्यकर्ते बॅनर्स लावत असताना, मुंबईत तसेच दिल्लीतही शरद पवार गटाकडूनही फलकबाजी करण्यात येत आहे. मुंबईतील विक्रोळी पार्कसाइईटमध्ये शरद पवार गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली. ‘आमचा पक्ष पवार साहेबच…’ अशा आशयाचे फलक तेथे लावण्यात आले. ‘ संकटं आली तरी डगमगायचं नाही. येतील वादळे, खेटेल तूफान, तरी वाट चालतो.. अडथळ्यांना भिऊन अडखळे, पावलांना पसंत नाही..’ असा संदेशही या फलकावर लावण्यात आला आहे.

तसेच दिल्ली येथील शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेरही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. ‘ जो अपना नही हुआ वो जनता का क्या होगा ‘ अशा आशयाचे पोस्टर्स लागले आहेत. धीरज शर्मा आणि सोनिया दुहन या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांकडून शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

कालच्या निवडणूक आयोगच्या निर्णयानंतर आता शरद पवार गटाला नेमकं कोणतं चिन्ह मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. तसेच अजित दादा यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह घड्याळ मिळाल्यानंतर घड्याळाची वेळ अजित दादांना येत्या निवडणुकांमध्ये साथ देईल का ? हे पाहणे देखील तितकाच महत्त्वाचे ठरेल.