नितीशकुमारांवर बोलण्याची रिया चक्रवर्तीची लायकी नाही, बिहार पोलीस महासंचालकांची आगपाखड

| Updated on: Aug 19, 2020 | 3:58 PM

"बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर बोलण्याची अभिनेत्री रिया चक्रवर्तीची लायकी नाही", असं बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे म्हणाले (Bihar DGP Gupteshwar Pandey slams Rhea Chakraborty).

नितीशकुमारांवर बोलण्याची रिया चक्रवर्तीची लायकी नाही, बिहार पोलीस महासंचालकांची आगपाखड
Follow us on

पाटणा :बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर बोलण्याची अभिनेत्री रिया चक्रवर्तीची लायकी नाही”, असं बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे म्हणाले. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतल्यानंतर गुप्तेश्वर पांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी रिया चक्रवर्तीने बिहारच्या मुख्यमंत्र्यांसंबधित केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता गुप्तेश्वर पांडेंनी टीका केली (Bihar DGP Gupteshwar Pandey slams Rhea Chakraborty).

“बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पाठिंब्यामुळेच सुशांत प्रकरणात न्याय मिळण्याची आशा आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर टिप्पणी करण्याइतपत रिया चक्रवर्तीची लायकी नाही”, असं गुप्तेश्वर पांडे म्हणाले (Bihar DGP Gupteshwar Pandey slams Rhea Chakraborty).

“सुप्रीम कोर्टाने सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्याने मी खूप खूश आहे. हा अन्यायाविरोधात न्यायाचा विजय आहे. हा देशाच्या 130 कोटी जनतेच्या भावनांचा विजय आहे. सुशांत प्रकरणाशीसंबंधीत खऱ्या गोष्टी उघड व्हाव्यात, अशी लोकांची इच्छा आहे. लोकांची ही इच्छा आता पूर्ण होईल”, अशी प्रतिक्रिया गुप्तेश्वर पांडे यांनी दिली.

हेही वाचा : मुंबई पोलिसांना सुप्रीम कोर्टाचा धक्का, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

“आमच्यावर आरोप केले जात होते, आम्ही एफआरआय का दाखल केला? असा सवाल विचारला जात होता. आम्हाला तपास करु देत नव्हते.  आमच्या तपासात अडथळा आणला जात होता. आम्ही तपासासाठी आयपीएस अधिकाऱ्याला पाठवले तर त्याला रातोरात क्वारंटाईन केलं गेलं. यातूनच काहीतरी गडबड आहे, हे जाणवत होतं”, असं गुप्तेश्वर पांडे म्हणाले.

“सुशांत आत्महत्या प्रकरणाचा नक्की तपास समोर येईल. ही लढाई फक्त एका कुटुंबाची नाही तर संपूर्ण देशाची ही लढाई आहे. ही एक हाय प्रोफाईल केस आहे. कित्येक लोकांना आपली पोलखोल होईल, अशी भीती सतावत आहे. सीबीआयच्या तपासात सर्व सत्य समोर येईल”, असं बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे म्हणाले.

हेही वाचा : ठाकरे सरकारची दादागिरी संपेल, सोमय्यांचा हल्लाबोल, राणे ते शेलार, विरोधकांचा घणाघात

सुप्रीम कोर्टाचा निकाल काय?

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची बिहार सरकारची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी कायम ठेवली. वडिलांच्या तक्रारीवरुन सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येसंदर्भात एफआयआर नोंदवण्याचा बिहार पोलिसांना हक्क असल्याचे न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या एकल खंडपीठाने म्हटले. बिहार पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर सर्वसमावेशक असल्याचे सांगत चौकशी सीबीआयला देण्याचे कोर्टाने मान्य केले. मुंबई पोलीस सक्षम असल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारनेही हा तपास सीबीआयकडे सोपवण्यास विरोध दर्शवला होता.

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र पोलिसांना खटल्याच्या फाइल्स सीबीआयकडे सोपवण्याचे आणि आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. “सीबीआय चौकशीचे आदेश कोर्टाने दिले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी त्याचे पालन केले पाहिजे आणि मदत केली पाहिजे” असे खंडपीठाने म्हटले. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदवण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही प्रकरणांचीही चौकशी करण्याचे निर्देशही कोर्टाने सीबीआयला दिले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीची याचिका फेटाळताना कोर्टाने हा आदेश दिला. ही एफआयआर पाटण्याहून मुंबईत हस्तांतरित करुन बिहार पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीला स्थगिती देण्याची मागणी रियाने केली होती. सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आपल्या मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप रियावर केला आहे.

सुशांतसिंह राजपूत याचा मृतदेह 14 जून रोजी वांद्र्यातील राहत्या घरी सापडला होता. सुशांतच्या अनैसर्गिक मृत्यूबद्दल मुंबई पोलिस कारवाई करत असताना त्याच्या वडिलांनी 25 जुलै रोजी रिया चक्रवर्ती आणि इतर पाच जणांविरोधात पाटणा येथील राजीव नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.