नागपूर महापौरपदाच्या फॉर्म्युल्यात मोठा बदल, गटबाजी रोखण्यासाठी भाजपचा निर्णय?

| Updated on: Nov 18, 2019 | 4:06 PM

महापौर पदासाठी झालेल्या सोडतीत नागपूर महापालिकेचे महापौरपद (BJP Nagpur Corporator Formula) खुल्या वर्गासाठी जाहीर झाले.

नागपूर महापौरपदाच्या फॉर्म्युल्यात मोठा बदल, गटबाजी रोखण्यासाठी भाजपचा निर्णय?
Follow us on

नागपूर : महापौर पदासाठी झालेल्या सोडतीत नागपूर महापालिकेचे महापौरपद (BJP Nagpur Corporator Formula) खुल्या वर्गासाठी जाहीर झाले. तेव्हापासूनच नागपूर महापालिकेचा महापौर कोण असणार याबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे. 149 नगरसेवक असलेल्या नागपूर महापालिकेत एकट्या भाजपचेच 106 नगरसेवक आहेत. त्यामुळे महापौर ((BJP Nagpur Corporator Formula)) भाजपचाच असणार हे अगदी निश्चित आहे.

भाजपचं बहुमत असताना भाजपतर्फे महापौरपदी कुणाची वर्णी लागणार हा चर्चेचा विषय आहे. अशातच भाजपने पुढील अडीच वर्षांचा कालावधी सव्वा वर्षात विभागून 2 महापौर देण्याचा निर्णय घेतला. यापैकी पहिले सव्वा वर्ष पालिकेतील विद्यमान सभागृह नेते संदीप जोशी, तर त्यानंतरचे सव्वा वर्ष पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी स्थायी समिती सभापती दयाशंकर तिवारी हे महापौरपदी राहणार आहेत.

उपमहापौर पदही सव्वा वर्षांसाठी विभागण्यात आले आहे. पहिले सव्वा वर्ष मनिषा कोठे यांच्याकडे, तर त्यानंतरचे सव्वा वर्ष उपमहापौराचा निर्णय नंतर ठरवण्यात येणार आहे. सभागृह नेते (सत्तापक्ष नेते) पदावर संदीप जाधव यांची वर्णी लागणार आहे.

महापालिकेतील पक्षीय बलाबल

भाजप – 106
काँग्रेस – 29
बहुजन समाज पक्ष – 10
शिवसेना – 02
राष्ट्रवादी – 01

संदीप जोशी हे भाजपचे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक असून लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. शिवाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणूनही ते ओळखले जातात. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात प्रचाराची जबाबदारी संदीप जोशी यांच्यावरच होती. दयाशंकर तिवारी हे देखील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक असून माजी स्थायी समिती सभापती राहिले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हिंदी भाषिकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून पश्चिम नागपूर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी दावेदारीही केली होती. परंतु पक्षाने त्यांची उमेदवारी नाकारली. पक्षामध्ये कुठलीही गटबाजी नसून सर्वच नेत्यांना संधी मिळावी म्हणून सव्वा-सव्वा वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीत हिंदी भाषिकांचा फटका भाजपला बसला होता. त्यामुळे पुढील सव्वा वर्षासाठी दयाशंकर तिवारी यांच्या रूपात हिंदी भाषिक महापौर देऊन हिंदी भाषिक मतदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत भाजपला बसलेला फटका महापालिका निवडणुकीत बसू नये याचीही काळजी भाजपने घेतली आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज भाजपतर्फे अर्ज दाखल करण्यात आले असून 22 नोव्हेंबरला निवडणूक घेण्यात येणार आहे.