भाजप आमदाराच्या वाढदिवसाला सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन, गर्दी जमवून जोरदार गोंधळ

| Updated on: Apr 05, 2020 | 5:28 PM

वर्धामध्ये भाजपच्या आमदारानेच याला हरताळ फासत वाढदिवसाला मोठी गर्दी जमवल्याचा प्रकार समोर आला आहे (BJP MLA violates Lockdown amid Corona)

भाजप आमदाराच्या वाढदिवसाला सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन, गर्दी जमवून जोरदार गोंधळ
Follow us on

वर्धा : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र, वर्धामध्ये भाजपच्या आमदारानेच याला हरताळ फासत वाढदिवसाला मोठी गर्दी जमवल्याचा प्रकार समोर आला आहे (BJP MLA violates Lockdown amid Corona). प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील नागरिकांना सहकार्य करत गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, भाजपचे आर्वी येथील आमदार दादाराव केचे यांनी संचारबंदी आणि जमावबंदीचं उल्लंघन करत वाढदिवस साजरा केल्यानं सर्वच स्तरातून यावर टीका होत आहे.

आमदार दादाराव केचे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्रित केलं. यासाठी रिक्षा फिरवून धान्य वाटपाचीही घोषणा करण्यात आली. त्यानंतर धान्य वाटपच्या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे भंग करण्यात आला. केचे यांच्या घरासमोर जमलेली गर्दी एखाद्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जमवलेल्या लोकांप्रमाणे भासत होती. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचं गांभीर्य आहे की नाही, असाच प्रश्न जाणकारांकडून विचारला जात आहे.

सामाजिक संघटनांकडून धान्य वाटप केलं जात आहे आणि त्या माध्यमातून प्रसिद्धीही मिळत असल्याचं लक्षात आल्यानं अनेक राजकीय नेत्यांकडून नियम धाब्यावर बसवून गर्दी जमवली जात आहे. असाच प्रकार आमदार केचे यांनीही केल्याचं पाहायला मिळालं. मात्र, त्यांच्या या कृतीवर समाज माध्यमातून टीका झाल्यानंतर त्यांनी हा आपल्या बदनामीचा कट असल्याचा आरोप केला आहे.

एकिकडे प्रशासन सूचना, विनंती, आदेश आणि अक्षरशः केविलवाणी विनवणी करून नागरिकांना लॉकडाऊनच्या काळात घरात रोखून धरत आहे. मात्र, भाजप आमदारांच्या या कृत्याने चक्क साथ रोग नियंत्रण कायद्यालाच हरताळ फासला गेला आहे. आता यावर प्रशासन काय पाऊल उचलतंय ते पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे.

आमदाराच्या वाढदिवसाच्या इव्हेंटनं वर्धा जिल्ह्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. तब्लिगी जमातला दोष देणारा भाजप गर्दी जमवणाऱ्या आपल्या आमदाराला पक्षाबाहेर काढण्याची हिंमत दाखवेल काय असा प्रश्न प्रहार सोशल फोरमचे बाळा जगताप यांनी उपस्थित केला आहे.

लोकप्रतिनिधीच गर्दी जमवत असतील, तर मग सामान्य माणसावर दाखल झालेल्या जमावबंदीच्या गुन्ह्याचं काय? असाही प्रश्न आता सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.

संबंधित बातम्या :

औरंगाबादेत कोरोनाचा पहिला बळी, राज्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या 36 वर

दिवे बंद होण्याच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा मंत्र्यांची तातडीची बैठक, रात्री 9 च्या दरम्यान स्वतः लक्ष देणार

‘कोरोना’सोबत राज्यासमोर ‘हे’ प्रमुख आव्हान, उपमुख्यमंत्र्यांचं सुतोवाच, उपायही सुचवला

वर्ध्यात मजुरांची कामावरुन हकालपट्टी, कंपनीला 2 लाखांचा दंड

BJP MLA violates Lockdown amid Corona