कल्याण-डोंबिवलीत सहा मुलांचे अपहरण करुन खून, स्मार्ट सिटी प्रकल्पाशी विद्यार्थ्यांनाही जोडा : रविंद्र चव्हाण

| Updated on: Oct 24, 2020 | 5:52 PM

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामांच्या आढावा बैठकीत भाजप आमदार रविंद्र चव्हाण भडकले (BJP MLA Ravindra Chavan get angry).

कल्याण-डोंबिवलीत सहा मुलांचे अपहरण करुन खून, स्मार्ट सिटी प्रकल्पाशी विद्यार्थ्यांनाही जोडा : रविंद्र चव्हाण
Follow us on

ठाणे : कल्याण-डोंबिवलीचा स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश आहे. गेल्या सहा वर्षांपासून प्रकल्पाचे काम सुरु आहे. मात्र, या प्रकल्पाचे अद्यापही 20 टक्केदेखील काम झालेलं नाही. दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेत आज (24 ऑक्टोबर) स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामांबद्दल आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भाजप आमदार रविंद्र चव्हाण संतापले (BJP MLA Ravindra Chavan get angry).

“कल्याण-डोंबिवलीत गेल्या काही वर्षात सहा शाळकरी मुलांचे अपहरण करुन खून झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संरक्षणाचा मुद्दा समोर आला आहे. विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी ट्रॅकिंग यंत्रणेद्वारे विद्यार्थ्यांना स्मार्ट सिटी प्रकल्पाशी जोडलं जावं, अशी मागणी अनेकवेळा केली. मात्र, वारंवार मागणी करुनही स्मार्ट सिटी व्यवस्थापन लक्ष देत नाही”, असं म्हणत रविंद्र चव्हाण यांनी रोष व्यक्त केला.

“स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाशी शालेय विद्यार्थ्यांना जोडून घेतले पाहिजे. ट्रॅकिंग सिस्टीम असेल तर एखाद्या विद्यार्थ्यासोबत अनुचित प्रकार घडल्यास त्याची माहिती लवकर मिळू शकते. ही मागणी वारंवार करुनदेखील स्मार्ट सिटी प्रकल्प व्यवस्थापन लक्ष देत नाही”, असं रविंद्र चव्हाण म्हणाले. यावेळी भाजपच्या इतर नेत्यांनीदेखील स्मार्ट सिटीच्या कामाच्या प्रगतीविषयी असमाधान व्यक्त केलं.

रविंद्र चव्हाण यांचा मुद्दा मनसे आमदार राजू पाटील यांनी उचलून धरला. राजू पाटील यांनीसुद्धा गुन्हेगारी रोखण्यासाठी सीसीटीव्हीचा उपयोग झाला पाहिजे, अन्यथा इतका खर्च करुन काय उपयोग? असा सवाल उपस्थित केला. प्रकल्पाचे काम संथगतीने सुरु आहे. त्यामुळे प्रकल्पाला गती द्या, अशी सूचना राजू पाटील यांनी आयुक्तांना दिली (BJP MLA Ravindra Chavan get angry).

दरम्यान, बैठकीत शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनीदेखील आपलं मत व्यक्त केलं. “कामाचे सल्लागार दोन वेळा बदलण्यात आले. तसेच कोरोनामुळे विलंब झाला असल्याची कबूली आयुक्तांनी दिली आहे. मात्र माझ्या कार्यकाळात बरेचसे काम प्रगतीपथावर आहे”, असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं.

या आढावा बैठकीत महापौर विनिता राणे, भाजप खासदार कपील पाटील, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर, मनसे आमदार राजू पाटील, भाजप आमदार गणपत गायकवाड, केडीमसी आयुक्त विजय सूर्यवंशी हे उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यालयात नक्की काय काम झालं, याचं सादरीकरण करण्यात आलं.

संबंधित बातमी :

कल्याण-डोंबिवलीत विकास कामं रखडली, भाजप नगरसेवकांचं पालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन