सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरे गटातून आणखी कोण फुटणार? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं
bacchu kadu news : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचे आणखी नेते फुटणार असल्याचे दावे केले जात आहेत. आता बच्चू कडू यांनीही आणखी नेते फुटणार नसल्याचा दावा केला.

राज्यात पावसाळी अधिवनेशनच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या अधिवेशनाच्या काळात ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार आणि 1 आमदार फुटले. काही दिवसांनी आणखी नेते फुटतील, असा दावा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या सचिन अहिर यांनीही ठाकरे गटाचा आणखी एक नेता फुटणार असल्याचा दावा केला आहे. सचिन अहिर यांच्यानंतर बच्चू कडू यांनीही पक्षफुटीच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. सचिन अहिर आले, आता त्यांची क्रिकेटची टीमही येणार, असं म्हणत आमदार बच्चू कडू यांनी सस्पेन्स वाढवला आहे.
राज्यात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या पावसाळी अधिवेशनादरम्यान उपसभापतीपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीदरम्यान सचिन अहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात उडी मारली. शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिर यांनी उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला. त्यानंतर काल ही निवडणूक बिनविरोध झाल्याने सचिन अहिर यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. आता सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचे आणखी नेते फुटणार असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. परंतु ठाकरे गटाचे नेते फुटणार नसल्याचे म्हणत विरोधक दावे फेटाळून लावत आहेत.
ठाकरेंचे आमदार सुनील शिंदे हे देखील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. परंतु ही चर्चा खुद्द सुनील शिंदे यांनी फेटाळून लावली. त्यानंतरही सुनील शिंदे हे फुटणार असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते बच्चू कडू करताना दिसत आहेत. बच्चू कडू म्हणाले, ‘ शिवसेनेत सचिन अहिर आले आहेत. आता त्यांची क्रिकेटची टीमही येणार आहे. आता त्याला संजय राऊत रोखू शकत नाही. सर्व खापर हे संजय राऊत यांच्यावर फुटत आहे. या प्रकरणानंतर उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांना भरपूर झापलं आहे. आता फक्त मारायचं राहिलंय. आता ठाकरेंच्या शिवसेनेवर संजय राऊतांमुळे परिस्थिती आली आहे. त्यामुळे ते काही पण बोलू लागले आहेत’.
ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांच्यावर भाष्य करताना बच्चू कडू म्हणाले, ‘सुनिल शिंदे यांनी नकार दिल्याचे कळतंय. पण नाही म्हणणारे पहिले येतात. आता आणखी काही खासदार-आमदारांच्या क्रिकेटची टीम शिवसेनेत येईल. पावसाचा जोर वाढल्यानंतर ‘ऑपरेशन टायगर’चाही जोर वाढेल’. बच्चू कडू यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
