भूकंपानंतर उद्ध्वस्त किल्लारी पुन्हा उभारणारा अधिकारी सांगलीत

| Updated on: Aug 12, 2019 | 5:27 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आणि सध्याचे मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी (IAS Pravin Pardeshi) त्यांच्या याच कौशल्यासाठी ओळखले जातात. 1993 मध्ये किल्लारीला भूकंप झाला तेव्हा त्यानंतर जे काम परदेशी यांनी केलं, त्याचं मोठ्या प्रमाणावर कौतुक झालं होतं.

भूकंपानंतर उद्ध्वस्त किल्लारी पुन्हा उभारणारा अधिकारी सांगलीत
Follow us on

सांगली : पुरानंतर पीडितांना पुन्हा उभं करण्याची जबाबदारी कर्तव्यदक्ष अधिकारी प्रवीण परदेशी (IAS Pravin Pardeshi) यांना देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आणि सध्याचे मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी (IAS Pravin Pardeshi) त्यांच्या याच कौशल्यासाठी ओळखले जातात. 1993 मध्ये किल्लारीला भूकंप झाला तेव्हा त्यानंतर जे काम परदेशी यांनी केलं, त्याचं मोठ्या प्रमाणावर कौतुक झालं होतं.

सांगली, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यात अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. या लोकांना पुन्हा उभं करण्याची जबाबदारी घेत प्रवीण परदेशी सांगलीत दाखल झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी याबाबत आढावा बैठकही घेतली.

1993 ला किल्लारी भूकंप झाला तेव्हा प्रवीण परदेशातील लातूरचे जिल्हाधिकारी होते. 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी प्रवीण परदेशी यांनी अनेक विभागांमध्ये काम केलंय. शिवाय मुख्यमंत्र्यांचे विश्वासू अधिकारी यापेक्षा त्यांच्या कामामुळे ते जास्त ओळखले जातात.

कोणत्याही नैसर्गिक आपत्तीनंतर लोकांना पुन्हा उभं करणं ही सर्वात मोठी जबाबदारी असते. पुरानंतर पसरणारी रोगराई, पडलेली घरं पुन्हा बांधणं, संसार उभा करण्यासाठी लोकांना बळ देणं, नुकसान भरपाई अशा अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. त्यामुळे यासाठी अनुभव असलेल्या अधिकाऱ्यावरच ही सर्व जबाबदारी टाकण्यात आली आहे.

सांगलीमध्ये पाणीपातळी 57.5 इंचांवर गेली होती, सध्या 50.5 इंचांवर आहे, 40 फुटापर्यंत इशारा पातळी आहे. दोन दिवसांत पूर ओसरुन पूर्ववत होईल, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.