जर शेतकरीविरोधी काळे कायदे मागे घेतले नाही तर खेलरत्न पुरस्कार परत करणार : बॉक्सर विजेंद्र सिंह

| Updated on: Dec 06, 2020 | 3:27 PM

जर केंद्र सरकारने शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेतले नाहीत तर मला दिलेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार परत करेन, असा इशारा बॉक्सर विजेंद्र सिंहने दिला आहे.

जर शेतकरीविरोधी काळे कायदे मागे घेतले नाही तर खेलरत्न पुरस्कार परत करणार : बॉक्सर विजेंद्र सिंह
Follow us on

नवी दिल्ली :  जर केंद्र सरकारने शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेतले नाहीत तर सरकारने मला दिलेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार परत करेन, (Rajiv Gandhi Khelratna Award) असा इशारा बॉक्सर विजेंद्र सिंहने (Vijender Singh) दिला आहे. आज (रविवारी) विजेंद्र सिंहने सिंघु बॉर्डरवर शेतकरी आंदोलनात आपला सहभाग नोंदवला. यावेळी केलेल्या भाषणात पुरस्कार परत करण्याचा इशारा दिला. (Boxer Vijender Singh Will Return Rajiv Gandhi Khelratna Award)

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीच्या सीमांवर हजारो शेतकऱ्यांचं गेल्या 11 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. केंद्राच्या कृषी कायद्याविरुद्ध आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंह बादल यांनी केंद्राचा पद्म विभूषण पुरस्कार परत केला आहे. अशातच आता खेळाडू विजेंद्र सिंहने पुरस्कार परत करण्याचा इशारा दिलाय.

“शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने ऐकून घ्याव्यात. त्यांचं म्हणणं सरकारने समजून घ्यावं. शेतकरीविरोधी काळे कायदे सरकारने मागे घ्यावे. जर सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे मागे घेतले नाहीत तर मी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार परत करणार” असल्याचं विजेंद्र सिंहने सांगितलं.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी पंजाबमधील खेळाडू पुढे आले आहेत. त्यांनी अ‌ॅवॉर्ड वापसी मोहीम हाती घेतली आहे. भारताचे माजी बास्केटबॉल खेळाडू आणि अर्जुन पुरस्कार विजेते सज्जच सिंह चिमा हे काही दिवसांपासून अर्जुन आणि पद्म पुरस्कार विजेत्या पंजाबमधील खेळाडूंशी पुरस्कार वापसी मोहीमेसाठी संपर्क करत आहेत.

‘शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. ज्या मातीतून शेतकरी पिक घेतो त्याच मातीतून खेळाडू जन्माला येतो. त्यामुळे आम्ही खेळाडू शेतकरी आंदोलनापासून दूर कसे राहू’, असं सज्जन सिंह चिमा म्हणाले. गेल्या चार दिवसांपूर्वी जालंधरमध्ये पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक खेळाडू सहभागी झाले होते. कृषी कायद्यामुळे फक्त शेतकऱ्यांचंच नाही तर संपूर्ण देशवासियांचं नुकसान होणार असल्याचं मत या खेळाडूंनी व्यक्त केलं.

जालंधरमध्ये खेळाडूंची महत्वपूर्ण बैठक

चिमा यांच्या अवॉर्ड वापसी मोहीमेला अनेक पुरस्कार विजेत्या 30 खेळाडूंची साथ मिळाली आहे. त्यात गुरमेल सिंह, सुरिंदर सिंग सोढी यांसारख्या मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. हे दोन्ही खेळाडू 1980 ला मॉस्कोमध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचं प्रतिनिधित्व करत होते. या संघानं त्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं.

(Boxer Vijender Singh Will Return Rajiv Gandhi Khelratna Award)

संबंधित बातम्या

केंद्राच्या कृषी कायद्याविरुद्ध शिरोमणी अकाली दल आक्रमक, प्रकाश सिंह बादल यांच्याकडून ‘पद्म विभूषण’ पुरस्कार परत!

कृषी कायद्यातील सर्वाधिक वादग्रस्त क्लॉज कोणता?; पी. साईनाथ म्हणतात…