21 दिवसांचा लॉकडाऊन वाढण्याच्या चर्चा, अखेर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण

| Updated on: Mar 30, 2020 | 11:09 AM

भारतातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1071 पर्यंत वाढली आहे. यापैकी 942 रुग्णांवर उपचार सुरु असून 99 जण बरे झाले आहेत. (Cabinet Secretary on extending Lockdown)

21 दिवसांचा लॉकडाऊन वाढण्याच्या चर्चा, अखेर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण
Follow us on

नवी दिल्ली : ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढण्याच्या चर्चा रंगलेल्या असताना केंद्राने मात्र ही शक्यता धुडकावून लावली आहे. ‘लॉकडाऊन वाढवण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही. असे अहवाल वाचून मला आश्चर्य वाटले’ अशी प्रतिक्रिया कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी ‘एएनआय’ला दिली. (Cabinet Secretary on extending Lockdown)

भारतात रविवार संध्याकाळपर्यंत कोरोना व्हायरसचे एक हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळल्याची सरकारी आकडेवारी आहे. भारतातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1071 पर्यंत वाढली आहे. यापैकी 942 रुग्णांवर उपचार सुरु असून 99 जण बरे झाले आहेत. तर 29 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) रविवारपर्यंत 34 हजार 931 रुग्णांच्या कोरोना चाचण्या घेतल्याचं सांगितलं.

केंद्राने सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांना राज्य आणि जिल्हा सीमा सील करण्यास सांगितले आहे. ज्यांनी आधीच राहते ठिकाण सोडले आहे, त्यांना 14 दिवस विलग (क्वारंटाईन) ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रसारित केलेल्या ‘मन की बात’ रेडिओ शोमध्ये देशभरात लॉकडाऊन जारी केल्यामुळे होणाऱ्या अडचणींसाठी देशवासियांची क्षमा मागितली. मात्र भारत देश जीवन आणि मृत्यू यांच्यात लढाई लढत असल्यामुळे हा निर्णय गरजेचा असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला होता.

‘कोरोना’शी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्चला 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या काळात केवळ जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठीच सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर पडण्यास मुभा आहे. 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊनचा कालावधी असेल. (Cabinet Secretary on extending Lockdown)