दुष्काळ निवारणासाठी आचारसंहिता शिथिल करा, मुख्यमंत्र्यांचं निवडणूक आयोगाला पत्र

| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

मुंबई : दुष्काळी उपाययोजना करता याव्या यासाठी महाराष्ट्रातील आचारसंहिता शिथिल करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. याबाबतचं पत्र त्यांनी लिहिलंय. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यात सध्या तीव्र उन्हाळा आहे. दुष्काळाचा […]

दुष्काळ निवारणासाठी आचारसंहिता शिथिल करा, मुख्यमंत्र्यांचं निवडणूक आयोगाला पत्र
Follow us on

मुंबई : दुष्काळी उपाययोजना करता याव्या यासाठी महाराष्ट्रातील आचारसंहिता शिथिल करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. याबाबतचं पत्र त्यांनी लिहिलंय. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.

राज्यात सध्या तीव्र उन्हाळा आहे. दुष्काळाचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची गरज आहे. विहिरी खणणे, पाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती, कॅनॉलची देखभाल ही कामे तीव्र उन्हाळ्यातच करावी लागतात. राज्य सरकारने 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. या दुष्काळाच्या निवारणासाठी केंद्र सरकारने 4714 कोटी रूपये मदत जाहीर केली. याचा आढावा घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक सुद्धा घेण्याची नितांत गरज आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्रात म्हटलंय.

वार्षिक आराखड्यात यापूर्वीच मंजूर असलेल्या विविध प्रकारच्या कामांच्या निविदा बोलावणे, निविदांचे मूल्यांकन, निविदा अंतिम करणे, कामांचे कंत्राट यासाठीही परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. रूग्णालयीन सुविधा, रस्त्यांची कामे, महापालिका आणि गाव पातळीवरची कामे इत्यादींचा यात समावेश आहे.

जी कामे पूर्वीपासून सुरू आहेत, त्याचा निवडणूक कामातील अधिकार्‍यांना वगळून वेळोवेळी आढावा घेण्याचीही परवानगीही या पत्रातून मागण्यात आली. यासाठी मंत्र्यांच्या दौर्‍यांनाही अनुमती प्रदान करावी, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. 2009 मध्ये अशाच प्रकारची परवानगी देण्यात आली होती. ही परवानगी मिळाल्यास दुष्काळी उपाययोजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करणे सोपे होईल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

देशात लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यांमध्ये होत आहे. पहिल्या चार टप्प्यात महाराष्ट्रातील 48 जागांसाठी निवडणूक झाली. विविध राज्यांमध्ये आणखी तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. तर 23 मे रोजी मतमोजणी होईल.