मध्यरात्री 12.30 ते पहाटे पाच, पालघरच्या 100 आरोपींना पकडलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

| Updated on: Apr 20, 2020 | 3:15 PM

हत्याकांड घडल्यावर आम्ही गप्प बसलेलो नाही. 16 तारखेला (16 एप्रिल) हे घडले, 17 तारखेला 100 आरोपी पकडले, असं मुख्यमंत्री म्हणाले. (CM Uddhav Thackeray on Palghar Mob lynching)

मध्यरात्री 12.30 ते पहाटे पाच, पालघरच्या 100 आरोपींना पकडलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालघर हत्याकांडाबद्दल राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. “पालघरमधील हत्याकांड हे धार्मिक नाही, त्याला हिंदू-मुस्लिम असा रंग देऊ नका. हे हत्याकांड गैरसमजातून झालं आहे. जे जे आरोपी आहेत, त्या सर्वांच्या मुसक्या आवळल्या असून 110 लोकांना अटक केलं आहे, जे दोषी आहेत, त्यांना महाराष्ट्र सरकार सोडणार नाही”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. (CM Uddhav Thackeray on Palghar Mob lynching)

मॉब लिंचिंगसारखी लांच्छनास्पद घटना पालघरजवळ घडली. पालघर म्हणतात, पण प्रत्यक्ष पालघरपासून 110 किमी दूर अंतरावर दादरा नगर हवेलीच्या सीमेजवळील गावात हे हत्याकांड घडले. त्या दिवशी काय झालं, तर गुजरातला लवकर जाता यावं म्हणून दोन साधू दुर्गम भागातून गाडीने जात होते. यावेळी दादरा नगर हवेलीजवळ पोलिसांनी त्यांना अडवून परत पाठवलं, त्यांना दादरा नगर हवेलीमार्गे पुढे जाऊ दिलं नाही. अडवल्यावर साधू पालघर सीमेवर परत आले, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

पालघर-दादरा नगर हवेली सीमेवर नीटसे रस्तेही नाहीत, हे दुर्दैव आहे. त्यातच गडचिंचले पाड्यात परिसरात चोर फिरत आहेत, अशी अफवा पसरली होती. त्याच गैरसमजातून दादरा नगर हवेलीत साधूंच्या गाडीवरही हल्ला झाला. जमावाने दोन साधू आणि त्यांच्या चालकाची हत्या केली, असं मुख्यमंत्री म्हणाले.

हत्याकांड घडल्यावर आम्ही गप्प बसलेलो नाही. 16 तारखेला (16 एप्रिल) हे घडले, 17 तारखेला 100 आरोपी पकडले. हत्याकांड घडले त्यावेळी किट्ट काळोख होता. पण एसपींनी पोलिसांना हाताशी घेऊन मध्यरात्री 12.30 वाजता कारवाई केली, पहाटे पाच वाजता जंगलातून 100 आरोपींना पकडलं. सर्व आरोपी 30 तारखेपर्यंत पोलिस कोठडीत आहेत. यातले पाच मुख्य आरोपी गजाआड आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

आम्ही कुणालाही सोडणार नाही. दोन पोलिसांना आम्ही निलंबित केले आहे सीआयडीच्या क्राइम ब्रँचकडे तपास दिला आहे. हत्याकांडाला धार्मिक रंग देऊ नका. सर्व जबाबदार लोकांना पकडले आहे. 9 अल्पवयीन तरुणांनाही सुधारगृहात पाठवले आहे. दादरा नगर हवेलीमध्ये पळून गेलेल्या आरोपींनाही पकडू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. (CM Uddhav Thackeray on Palghar Mob lynching)

गैरसमजुतीतून हल्ला होऊन हत्याकांड घडले. हे हत्याकांड दोन धर्मातल्या वादातून घडलेलं नाही. गैरसमजातून हत्या झाली असूनही कोणालाही सोडणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

हत्याकांडप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी मी बोललो आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही बोलणं झालं. शाहांनाही माहित आहे, हे प्रकरण धर्माधर्माचे नाही. काळजी घ्या असे अमित शाह म्हणाल्याचं उद्धव यांनी सांगितलं. डीजी सीआयडी क्राईम अतुल कुलकर्णी यांना त्यांच्या नेतृत्वाखाली याप्रकरणी शोध करायला सांगितलं आहे. हे प्रकरण आपण सीआयडीकडे दिलं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रात मॉब लिंचिग सहन केले जाणार नाही. 5 वर्षांपूर्वी अशी हत्याकांडे घडली, आता नाही. हल्लेखोर आता सुटणार नाहीत. साधूच नव्हे, पोलिसांवरही हल्ले केले आहेत. लोकांचा विश्वास हेच माझ्या सरकारचे बळ आहे. कोरोनाचे युद्ध जिंकू, गुंडगिरीविरुद्धही जिंकू. सोशल मीडियावरच्या आगलाव्यांबद्दलही शाहांना बोललो. त्यांना शोधायला शाहांना सांगितले आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.


संबंधित बातम्या :

पालघर हत्याकांड धार्मिक वादातून नाही, खटला CID कडे, अमित शाहांशीही चर्चा : मुख्यमंत्री

पालघर झुंडीकडून हत्या, योगी आदित्यनाथांचा उद्धव ठाकरेंना फोन, गंभीर, पठाणसह सेलिब्रिटींकडूनही निषेध

(CM Uddhav Thackeray on Palghar Mob lynching)