सोलापुरात चेक वाटप, उस्मानाबादमध्ये काय? मुख्यमंंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याकडे नुकसानग्रस्तांचं लक्ष

| Updated on: Oct 20, 2020 | 8:04 PM

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या म्हणजेच बुधवारी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

सोलापुरात चेक वाटप, उस्मानाबादमध्ये काय? मुख्यमंंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याकडे नुकसानग्रस्तांचं लक्ष
Follow us on

उस्मानाबाद : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या म्हणजेच बुधवारी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते शेतकऱ्यांच्या व्यथा समजावून घेतील तसंच त्यांच्या मागण्या ऐकतील. यावेळी ते जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देतील तसेच शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधतील. (Cm uddhav thackeray Wednesday Visit Osmanabad)

परतीच्या पावसाने महाराष्ट्रात थैमान घातलंय. अनेक ठिकाणी घरांची पडझड झालीये तर शेतीचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेलाय. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी सोलापुरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25 हजार रुपये मदतीचे चेक दिले. ही मदत अपुरी असली तरी बळीराजा सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसला आहे.

असा असेल मुख्यमंत्र्यांचा उस्मानाबाद दौरा

सकाळी 9.30 वाजता. सोलापूर शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने काटगावकडे (ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) प्रयाण, सकाळी 10.15 वाजता काटगाव येथे आगमन, अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी.

सकाळी 10.30 वाजता काटगाव येथून तुळजापूर मार्गे अपसिंगा (ता. तुळजापूरकडे) प्रयाण. सकाळी सव्वा 11 वाजता अपसिंगा येथे आगमन व अतिवृष्टीमुळे घरांची पडझड व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी.

सकाळी 11.35 वाजता अपसिंगा येथून तुळजापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.

दुपारी 12.20 वाजता पूर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, व अभ्यागतांच्या भेटी राखीव.

दु. 1 ते 1.45 वाजेपर्यंत राखीव.

मुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा

अतिवृष्टीचे संकट टळेपर्यंत नुकसानभरपाईसंदर्भात कोणताही निर्णय घाईने घेतला जाणार नाही. सध्या आम्ही माहिती घेण्याचे काम करत आहोत. विविध भागांत नुकसानीचे पंचनामेही सुरु आहेत. या सगळ्याचा अंदाज घेतल्यानंतर प्रत्यक्ष मदत जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. सोलापूरच्या अतिवृष्टीग्रस्तांची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

नुकसानग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला.

फडणवीसांचा उस्मानाबाद दौरा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. तसंच लवकरात लवकर मदत मिळण्यासाठी तुमच्या व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवतो, असा धीर फडणवीसांनी दिला.

पावसाने कांदा, सोयाबीन व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे तसंच शेती वाहून गेल्याचं गाऱ्हाणं शेतकऱ्यांनी फडणवीसांच्या कानावर घातलं. तसंच मदत न मिळाल्यास आत्महत्या केल्यावाचून आमच्याकडे काही एक पर्याय नसल्याचं शेतकऱ्यांनी फडणवीसांना सांगितलं. त्यावर ‘तुमच्यावर अशी वेळ येऊ देणार नाही. आपण सरकारकडे जास्तीत जास्त मदत मागू’, असं फडणवीस म्हणाले.

(Cm uddhav thackeray Wednesday Visit Osmanabad)

संबंधित बातम्या

नुकसान भरपाईचा निर्णय घाईघाईत घेणार नाही; पंचनामे झाल्यानंतरच मदत मिळेल- मुख्यमंत्री

मदत मागितली बिघडलं कुठं?; केंद्रातील सरकार हे परदेशातील सरकार नाही; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला