गुलाम नबी आझाद यांना पक्षातून ‘आझाद’ करा, काँग्रेस नेत्यांची थेट मागणी

| Updated on: Nov 23, 2020 | 2:31 PM

संधीसाधू नेत्यांना तातडीने पक्षातून काढून टाकण्याची विनंती उत्तर प्रदेशातील काँग्रेस पदाधिकाऱ्याने केली आहे

गुलाम नबी आझाद यांना पक्षातून आझाद करा, काँग्रेस नेत्यांची थेट मागणी
Follow us on

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर पक्षांतर्गत कलह समोर आला आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी काँग्रेसच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर घमासान सुरु झालं आहे. गुलाम यांना पक्षातून ‘आझाद’ करा, अशी थेट मागणी हरियाणाचे काँग्रेस आमदार आणि युवा काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव चिरंजीव राव (Chiranjeev Rao) यांनी केली आहे. अशा संधीसाधू नेत्यांना तातडीने पक्षातून काढून टाकण्याची विनंतीही उत्तर प्रदेशातील काँग्रेस पदाधिकाऱ्याने केली आहे. (Congress leaders ask to remove Ghulam Nabi Azad from party)

बिहार विधानसभा निवडणुकीतील खराब कामगिरीबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद म्हणाले होते, की निवडणुकीतील पराभवाची चिंता सर्वांनाच आहे. आमच्या लोकांचा ग्राऊण्ड लेव्हलवर जनतेशी संपर्क तुटला आहे. पराभवासाठी मी पक्षाच्या नेतृत्वाला दोष देत नाही. मात्र पक्षाशी संबंधित कार्यकर्त्यांचा तळगाळातील संपर्क कमी झाला आहे.

“जनतेने पक्षावर प्रेम केले पाहिजे. गेल्या 72 वर्षात काँग्रेस नीच्चांकी पातळीवर आहे. पंचतारांकित संस्कृतीने निवडणुका जिंकल्या जात नाहीत. आजच्या नेत्यांची सर्वात मोठी समस्या ही आहे की पक्षाकडून तिकीट मिळाले, की ते सर्वप्रथम पंचतारांकित हॉटेल बुक करतात” अशी टीकाही गुलाम नबी आझाद यांनी केली होती.

जर एखादा ओबडधोबड रस्ता असेल, तर ते तिथे जात नाहीत. पंचतारांकित संस्कृती सोडण्याची वेळ आता आली आहे. आपण ती सोडत नाही तोपर्यंत कोणतीही निवडणूक जिंकता येणार नाही, असंही आझाद यांनी बजावलं होतं.

‘आझादजी, जेव्हा आमचे नेते राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेते कठीण परिस्थितीत रस्त्यावर उतरले होते, तेव्हा तुम्ही कुठे होतात? अशा संधीसाधू नेत्यांना तातडीने पक्षातून काढून टाकण्याची विनंती कॉंग्रेस नेतृत्वाला आहे’ असं ट्विट उत्तर प्रदेश काँग्रेसचे मीडिया प्रभारी ललन कुमार यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या :

अन्यथा पुढील 50 वर्षे काँग्रेसला विरोधीपक्षातच बसावे लागेल : गुलाम नबी आझाद

लोकांना आमच्याकडून आशा उरलेल्या नाहीत; काँग्रेस नेतृत्त्वाला बिहारमधील पराभव सामान्य बाब वाटत असावी: कपिल सिब्बल

(Congress leaders ask to remove Ghulam Nabi Azad from party)