सध्या मल्टीस्टारचा जमाना, तीन हिरो पाहिजेत म्हणून आम्ही एकत्र : अशोक चव्हाण

| Updated on: Jan 27, 2020 | 9:23 AM

"कुणालाही वाटलं नव्हतं आम्ही एकत्र येऊ. मात्र, हल्ली मल्टीस्टारचा जमाना आहे. सिनेमात तीन-तीन हिरो पाहिजेत. त्यामुळे आम्ही तीन पक्षांचं सरकार आणलं", असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

सध्या मल्टीस्टारचा जमाना, तीन हिरो पाहिजेत म्हणून आम्ही एकत्र : अशोक चव्हाण
Follow us on

नांदेड : “राजकारण आणि चित्रपट-नाटक क्षेत्र जवळपास सारखेच आहेत. दोन्ही क्षेत्रांमध्ये सिनेमा चालेल का? सांगता येत नाही. एखादा सिनेमा चालला तर चांगलाच चालतो, अन्यथा एकदम खाली पडतो. सुदैवानं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे आमचा सर्वांचा राजकीय सिनेमा सध्या चांगला चालतोय. कुणालाही वाटलं नव्हतं आम्ही एकत्र येऊ. मात्र, हल्ली मल्टीस्टारचा जमाना आहे. सिनेमात तीन-तीन हिरो पाहिजेत. त्यामुळे आम्ही तीन पक्षांचं सरकार आणलं”, असं मिश्किल वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं (Congress Minister Ashok Chavan on Maha Vikas Aghadi government). प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

“तीन पक्षांचं सरकार म्हणजे तीन विचारांचं सरकार, हे सरकार चालणार कसं? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दिल्लीमध्ये आमच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटलो. त्यांनी परवानगी देण्यास नकार दिला. रोज भांडणं होतील. रोज प्रश्न निर्माण होतील. सरकार चालणार कसं? आम्ही सांगितलं, चिंता करु नका. मी स्वत: मुख्यमंत्री म्हणून दोन पक्षांचं सरकार चालवलं आहे. त्यात अजून एका पक्षाची भर होईल. त्यात चिंता करायचं कारण नाही’, असं अशोक चव्हाण म्हणाले (Congress Minister Ashok Chavan on Maha Vikas Aghadi government).

“काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आम्हाला सांगितलं की, संविधानाच्या चौकटीतच सरकार चाललं पाहीजे. संविधानाच्या चौकटीबाहेर बाहेर जायचं नाही आणि तसं झालं तर सरकारमधून बाहेर पडायचं, अशी कडक सूचना त्यांनी दिली. याबाबत संपूर्ण माहिती आम्ही उद्धव ठाकरे यांना दिली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या बाहेर जाणार नाहीत. घटना हीच शिरोधार्य मानून घटनेच्या चौकटीत सरकार चालणार, अशी भूमिका घेतली”, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.