Farmers Delhi protest | काँग्रेसकडून आंदोलनाचे समर्थन, तर साहित्य संमेलनाध्यक्षांचा शेतकऱ्यांना पाठिंबा

| Updated on: Dec 03, 2020 | 9:08 PM

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारा ठराव काँग्रेसने मंजूर केला आहे, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली. (Congress support farmer agitation)

Farmers Delhi protest | काँग्रेसकडून आंदोलनाचे समर्थन, तर साहित्य संमेलनाध्यक्षांचा शेतकऱ्यांना पाठिंबा
Follow us on

मुंबई : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशभरात निदर्शनं करण्यात येत आहेत. दिल्लीमध्ये पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुआहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देणारा ठराव राज्यातील काँग्रेसने (state Congress) मंजूर केला आहे. काँग्रेस पक्षाच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाची ही बैठक महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. (Congress passed a resolution in support of the farmer’s agitation)

“केंद्र सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर शेतकरीविरोधी कायदे मंजूर केले आहेत. या कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. महाराष्ट्र काँग्रेस या शेतकऱ्यांसोबत आहे. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत आहे,” असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

“आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. काँग्रेस पक्ष सातत्याने हे अन्यायी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आला आहे. या लढाईत पहिल्या दिवसापासून काँग्रेसने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्षाची मशाल हाती घेतलेली आहे. भाजपचे शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचे षडयंत्र आहे. शेतकऱ्यांना त्यांचे न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी काँग्रेस सदैव तत्पर आहे. शेतकऱ्यांच्या या लढ्यात काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे,” असे थोरात म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत गुरुवारी (3 डिसेंबर) राज्यभर आंदोलन केले. जिल्हा तसेच ब्लॉक स्तरावर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. काँग्रेसच्या या आंदोलनाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला.

या बैठकीला सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वड्डेटीवार, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे गटनेते शरद रणपिसे, सहप्रभारी आशिष दुआ, खासदार कुमार केतकर यांच्यासह अन्य आमदार उपस्थित होते.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचा शेतकऱ्यांना पाठिंबा

93 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच, केंद्र सरकारने एक पाऊल मागे येऊन शेतकऱ्यांना बळ द्यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

“कुठलेही धोरण राबविताना शेवटच्या घटकांचा विचार व्हावा, असे सूत्र महात्मा गांधींनी घालून दिले आहे. कृषी कायद्यांविरोधात आंदोलने होत आहेत. शेतकरी थंडीमध्ये रस्त्यावर का आला याचा विचार शासनाने करण्याची वेळ आली आहे. आपल्याकडे बहुमत आहे आणि या बहुमताच्या जोरावर आपण काहीही करू शकतो, हे आता चालणार नाही. शेतकरी हा राजा आहे . या बळीराजाचा बळी घेतला जात आहे. हे दुर्देव आहे. म्हणून शासनाने एक पाऊल मागे घेऊन शेतकऱ्यांची मने जिंकावीत,” असे फादर फ्रान्सिस दिब्रिटो म्हणाले.

संबंधित बातम्या :

Farmer Protest | महाराष्ट्रातही शेतकरी आंदोलनाचा वणवा पेटला; चांद्यापासून बांद्यापर्यंत शेतकऱ्यांचा आसूड कडाडला!

पंजाबमधील खेळाडूंचा शेतकरी आंदोलनाला भक्कम पाठिंबा, कृषी कायद्याविरुद्ध ‘अवॉर्ड वापसी’ मोहीम!

PHOTO | दिल्लीत शेतकरी आंदोलनाचा 8वा दिवस, पोलिसांकडून रस्ते बंद, वाहनांच्या लांबच लांब रांगा!

(Congress passed a resolution in support of the farmer’s agitation)