पांढऱ्या सोन्याला लाल बोंड अळीचं ग्रहण, शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात

| Updated on: Nov 01, 2020 | 5:39 PM

कपाशीवर मोठ्या प्रमाणात लाल बोंड अळीने आक्रमण केल्याने बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. (Cotton crop loss due to red bollworm)

पांढऱ्या सोन्याला लाल बोंड अळीचं ग्रहण,  शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात
वरुण ठाकरे या युवा शेतकऱ्याच्या शेतातील कपाशीच्या पिकावर बोंड अळीने आक्रमण केले आणि कपाशीचे पीक काढणीच्या वेळी मातीमोल झाले.
Follow us on

बुलडाणा: कोरोना आणि लॉकडाऊनमुळं अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या मागील संकटाची मालिका संपण्याचे नाव घेत नाही. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले मूग, उडीद, सोयाबीनचे पीक हिरावून घेतले. आता कपाशीवर मोठ्या प्रमाणात लाल बोंड अळीने आक्रमण केल्याने बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. (Cotton crop loss due to red bollworm farmers demand help of agriculture department )

कपाशीवर लाल बोंड अळीनं आक्रमण केल्यामुळं शेतकऱ्यांपुढं नव संकट निर्माण झालं आहे. कृषी विभागाने बोंड अळीचा कपाशीवरील प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सतत नैसर्गिक आपत्तीला तोंड देत आहे. बुलडाणा जिल्ह्यात गेल्या चार वर्षापासून कोरडा दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी या संकटांना तोंड देत पुरता हैराण झाला आहे. यावर्षी खरिपाच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस पडल्याने गेल्या तीन-चार वर्षापासूनची झीज भरून निघेल अशी आशा शेतकऱ्याला होती. मात्र, या खरीप हंगामात सुरुवातीला मूग उडीद पीकांची अतिवृष्टीमुळे दाणादाण उडवली. सोयाबीन पाण्यात भिजल्याने त्यातून शेतकऱ्यांचा खर्चही निघाला नाही.

कपाशीवर देखील बोंड अळीने आक्रमण केल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. त्यामुळे बोंड अळीवरील प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे. तर सरकारने देखील शेतकऱ्याला संकटातून काढण्यासाठी मदत करावी ही अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

साडेतीन एकरवर कपाशीची लागवड केली होती. पाच सहा वेळा फवारणी करुनही बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी झाला नाही. सरकारनं आणि कृषी विभागानं शेतकऱ्यांच्या या अडचणीकडं लक्ष द्यावे, अशी मागणी प्रल्हाद दुतोंडे या बोरीअडगाव येथील शेतकऱ्यानं केली आहे.

यवतमाळमध्येही कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव

यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्यातील कुंभा येथील शेतकरी वरुण ठाकरे या युवकाला या हंगामात कपाशीच्या पिकाकडून मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा होती. पण, ऐन काढणीच्यावेळी उभ्या कपाशीच्या पिकावर बोंड अळीने आक्रमण केले आणि कपाशीचे पीक मातीमोल झाले. या शेतकऱ्याला केवळ चार क्विंटल कापूस घरी आल्यानंतर ही बोंड अळी संपूर्ण पीक मातीत घालेल हे कळून चुकले. यांनंतर युवकाने दोन एकरावर फवारणी केली.

संबंधित बातम्या :

Aurangabad Rain | औरंगाबादेत मुसळधार पाऊस, सोयाबीन-कपाशी पिकांचं नुकसान

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत, बांधावर जाऊन मंत्री बच्चू कडूंचं आश्वासन

(Cotton crop loss due to red bollworm farmers demand help of agriculture department )