राज्यात सायबर सुपारीचा वाढता ट्रेंड, महिलांविरोधात सर्वाधिक सायबर गुन्हे, महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी

| Updated on: Oct 20, 2020 | 12:29 PM

देशात गेल्या वर्षभरात तब्बल 63.5 टक्के सायबर गुन्हे वाढले. यात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे (Cyber Crime increases in Maharashtra).

राज्यात सायबर सुपारीचा वाढता ट्रेंड, महिलांविरोधात सर्वाधिक सायबर गुन्हे, महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी
Follow us on

नागपूर : खून, चोरी, दरोडा, मारहाण, दंगे यांसारखे थेट घडणारे गुन्हे सोडवण्यात पोलिसांचा हातखंडा आहे. पण आता डिजीटल आणि हायटेक झालेल्या युगात सायबर क्राईम नावाचं नवं आव्हान पोलिसांपुढे उभं राहिलं आहे. देशात गेल्या वर्षभरात तब्बल 63.5 टक्के सायबर गुन्हे वाढले. यात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे (Cyber Crime increases in Maharashtra).

नागपुरात काल (19 ऑक्टोबर) गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतलेल्या शिबिरात सायबर गुन्ह्यांच्या अनेक तक्रारी आल्या. कुणाचे बँकेतून परस्पर पैसे चोरी केले, तर कुणाच्या कागदपत्रात हेरफार करुन प्रॉपर्टी लाटली, तर काही महिलांची चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी, गृहमंत्र्यांसमोर या सायबर गुन्ह्यांचा पाढाच अनेकांनी वाचलाय. राज्य आणि देशातली परिस्थितीही वेगळी नाही.

हेही वाचा : नागपुरात लॉकडाऊनमध्ये सायबर गुन्ह्यात मोठी वाढ, महिला सॉफ्ट टार्गेट

महिलांविरोधातील सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. नागपुरात गृहमंत्र्यांच्या शिबिरातही सायबर गुन्ह्यांच्या अनेक तक्रारी आल्या. त्यामुळेच महाराष्ट्र पोलिसांनी मिशन सायबर गुन्हे विभाग मजबूतीकरण सुरु केल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगीतलं (Cyber Crime increases in Maharashtra).

महिलांना अश्लील मेसेज पाठवणे, महिलांची अश्लील व्हिडीओ क्लीप व्हायरल करणे, समाजात तेढ निर्माण करणारे संदेश फॉरवर्ड करणे, बँक खात्यांमधील रक्कम लंपास करणे, संपतीवर ऑनलाईन दरोडा, सोशल मीडियात बदनामीचा कट, सायबर गुन्ह्यांची अशी भली मोठी यादी आहे.

वाढते सायबर गुन्हे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे, पण सायबर गुन्हे कमी करण्यासाठी पोलिसांसोबतच समाजानंही पुढाकार घेण्याची गरज आहे. सध्या समाजात सायबर सुपारीचा ट्रेंड वाढला आहे, हे धोकादायक आहे, असं मत सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केलं.

देशात गेल्या वर्षभरातील सायबर गुन्हे – 44 हजार 546

देशात वर्षभरात सायबर गुन्ह्यात वाढ – 63.5 टक्के

महाराष्ट्रात गेल्या वर्षभरातील सायबर गुन्हे – 4 हजार 967

देशात सोशल मीडिया आणि इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढला आहे. त्यामुळेच सायबर गुन्ह्यांचं प्रमाणंही वाढलं आहे. पण सोशल मीडिया वापरणाऱ्या तरुणांनी याच्या सकारात्मक वापराकडे लक्ष दिलं, शिक्षण, संवाद, आणि संदेश आदान प्रदान करण्याचं मुक्त व्यासपीठ म्हणून, सोशल माध्यमांकडे बघीतलं, याबाबत जनजागृती झाली, तर घडणारे सायबर गुन्हे तिथल्या तिथेच थांबवणं आणि कमी करणं शक्य असल्याचं, तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे पोलिसांसोबत आपणही जागरुक नागरीक म्हणून सायबर क्राईमविरोधात उभं राहणं गरजेचं आहे.