कपड्यांसाठी 1800, भांड्यांसाठी 2 हजार, घरांसाठी 95 हजार, वादळग्रस्तांसाठी उद्यापासून थेट मदत!

| Updated on: Jun 06, 2020 | 8:09 PM

वादळात नुकसान झालेल्या नागरिकांना कशी मदत मिळेल, किती रुपये मिळतील हे उदय सामंत यांनी सांगितलं. (Minister Uday Samant on Compensation of Nisarga Cyclone )

कपड्यांसाठी 1800, भांड्यांसाठी 2 हजार, घरांसाठी 95 हजार, वादळग्रस्तांसाठी उद्यापासून थेट मदत!
Follow us on

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने कोकण अक्षरश: उद्ध्वस्त केलं आहे. लाखो घरं, असंख्य झाडं पडली आहेत. अशा परिस्थितीत राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नुकसानग्रस्तांना तातडीने मिळणाऱ्या मदतीचं स्वरुप स्पष्ट केलं. दापोली इथं झालेल्या पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली. हजारो घरांची पडझड झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कशी मदत मिळेल, किती रुपये मिळतील हे उदय सामंत यांनी सांगितलं. (Minister Uday Samant on Compensation of Nisarga Cyclone )

“जुन्या जीआरनुसार कपडे लथ्थ्यांसाठी 1800 रुपये, भांड्यांसाठी 2 हजार रुपये आणि ज्यांच्या घराचं पूर्ण नुकसान झालं आहे त्यांना 95 हजार रुपये देण्यात येतील. ही मदत उद्यापासून थेट बँकांमध्ये जमा होईल. मात्र नागरिकांना बँकांमध्ये जाण्याची गरज नाही, बँका गावात येऊन पैशांचं वाटप करतील”, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

उदय सामंत म्हणाले, “35 हजार घरं दापोलीत आणि मंडणगडमध्ये 20 ते 25 हजार घरांची पडझड झाली आहे. या नागरिकांच्या मनात प्रश्न आहे की आम्हाला मदत कशी मिळणार. पूर्वीच्या जीआरप्रमाणे मदतीची कार्यवाही केली जाईल. त्यानुसार अंशता नुकसानीसाठी 6 हजार 500 रुपये, कपड्या-लथ्थ्याच्या नुकसानीसाठी 1800 रुपये आणि 2 हजार रुपये भांड्याकुंड्यांसाठी असे एकूण 10 हजार 300 रुपयांचा जीआर आहे. अशा पद्धतीने नुकसान भरपाई दिली जाईल.

ज्यांचं पूर्णत: नुकसान झालं आहे त्यांना 95 हजार रुपये दिले जाणार आहेत. आज आम्ही असा निर्णय घेतला आहे की पंचनामे होण्यासाठी 2-4 दिवस लागतील, त्यापूर्वी ज्यांची बँकांमध्ये अकाऊंट आहेत, त्यांच्या खात्यावर जिल्हाधिकारी नुकसानभरपाई पाठवतील. ज्यांचं अंशत: नुकसान झालं आहे, त्यांच्या खात्यावर सुरुवातीला 5 हजार रुपये पाठवले जातील. पूर्णत: ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना 25 हजार पाठवतील. ही तात्काळ मदत पाठवत आहोत”.

मदतीचं स्वरुप काय?

  • अंशता नुकसान – 10,300 रुपये (कपडे -1800 रु, भांडी – 2000 रु, अन्य नुकसान – 6500)
  • पूर्ण नुकसान – 95 हजार रुपये
  • अंशता नुकसान झालेल्यांना उद्यापासून तात्काळ 5 हजार रुपये
  • पूर्णत: नुकसान झालेल्यांना उद्यापासून तात्काळ – 25 हजार रुपये
  • बँकांमध्ये जाण्याची गरज नाही, बँकाच गावात जाऊन मदतीचं वाटप करणार
  • 75 हजार पत्र्यांची गरज, पत्रे उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न
  • रेशन मिळालेल्यांनाही पुन्हा रेशन देणार (5 किलो तांदूळ, 1 लिटर केरोसिन आणि 1 किलो डाळ)
  • अपंगांना समाज कल्याण विभागातून मदत

उद्यापासून बँका गावात येतील

नुकसानग्रस्त भागाचा आम्ही दौरा केला, यावेळी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे तात्काळ आर्थिक मदत गरजेची आहे. पंचनामे होण्यासाठी आणखी ३-४ दिवस लागू शकतात. मात्र त्यापूर्वी उद्यापासून हे पैसे बँकेत जमा होण्यास सुरु होतील. हे पैसे विविध बँकांमध्ये जमा होतील, पण रस्त्यांची परिस्थिती आणि कोरोनाचं संकट पाहता, सर्व लोक बँकांच्या मुख्य शाखांमध्ये येणे शक्य नाही, त्यामुळे बँका गावात जाऊन पैसे वाटप करतील, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

अपंगांना समाज कल्याण विभागामार्फत मदत

जे अपंग आहेत आणि त्यांच्या घरांचं नुकसान झालं आहे, अशांना समाज कल्याण विभागामार्फत देण्यात येणार आहे. समाज कल्याण विभागामार्फत पहिल्यांदाच वाटप होत आहे, असं उदय सामंत म्हणाले.

ज्यांना रेशन मिळालं पण या वादळात गेलं, त्यांना पुन्हा धान्य मिळेल. पाच किलो तांदूळ, १ लिटर केरोसिन आणि १ किलो डाळ हे उद्या संध्याकाळपर्यंत पोहोच होईल.

75 हजार पत्र्यांची गरज

अनेक घरांची पडझड झाली आहे. बहुतेक घरावरील पत्रे उडून गेले आहेत. एक-दोन तालुक्यांमध्येच 75 हजारपेक्षा जास्त पत्रे लागतील. एवढे पत्रे ग्रामीण भागात मिळू शकत नाहीत. हे कसे उपलब्ध करायचे याचे प्रयत्न सुरु आहेत. ते उपलब्ध करुन देऊ.

याशिवाय बी बियाणेही पुरवले आहेत. मोफत धान्याबद्दल प्रयत्न सुरु आहेत. कोकणावर मुख्यमंत्र्यांचं प्रेम आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ते भरघोस निधी देतील असंही मंत्री उदय सामंत म्हणाले.

(Minister Uday Samant on Compensation of Nisarga Cyclone )